सध्या भोंग्याच्या प्रश्नावरून चर्चेत आलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आज एका पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी देत पत्रात उर्दू शब्दांचा वापर करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे राज ठाकरे यांना राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने सुरक्षा पुरवावी अशी मागणी करत यासंदर्भातील तक्रार आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेवून केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. बाळा नांदगावकर यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटेल असा इशारा दिला. धमकीच्या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आले असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे. राज्य आणि केंद्र सरकारने याची दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
बाळा नांदगावकर यांनी आज सकाळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी नेमकी काय चर्चा केली होती याची माहिती दिली नव्हती. भेटीनंतर त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या भेटीचं कारण उघड केलं आणि राज ठाकरेंना धमकी मिळाली असल्याची माहिती दिली.
पत्र कोणी दिलंय याची माहिती नाही. पण ते पोस्टातून माझ्या कार्यालयात आलं आहे. गृहमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी ताबडतबोत पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. पण मी एवढंच सांगू इच्छितो की, बाळा नांदगावकर ठीक आहे पण राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही याची दखल राज्य सरकारने घ्यावी. मी वारंवार राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागत आहे. राज्य सरकार दखल घेत नाही, किमान केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी असेही ते म्हणाले.
भोंग्याचा विषय धार्मिक नव्हे तर सामाजिक आहे. संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशातील लोकांना याचा त्रास होत आहे. सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Marathi e-Batmya