मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मदत देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने या शेतकऱ्यांना उद्यापासून मदतीचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
हि मदत उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीत काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मुंबई लोकल सुरु करण्यावरून केंद्राचे राजकारण-
missionbeginagain अंतर्गत मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा खुली करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून यापूर्वीच रेल्वेला पत्र पाठविण्यात आले. मात्र केंद्र सरकारकडून याप्रकरणी राजकारण केले जात असून लोकल सेवा सुरु करण्यास अद्याप परवानगी दिली नसल्याचा आरोप मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला.
सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकलसेवा सुरु करण्याच्या अनुषंगाने रेल्वेला पत्र देवून जवळपास आठवडा झाला. तसेच दोन वेळा बैठकाही घेण्यात आल्या. परंतु त्याबाबत रेल्वेने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही.
त्यामुळे केंद्र सरकार लोकल सुरु करण्याबाबत राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
Marathi e-Batmya