भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे वारंवार उघड झाले आहे. शेतकऱ्याला अतिरेकी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणून त्यांचा अपमान केला आता राज्यातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अकलेचे तारे तोडले आहेत. कोकाटे यांचे शेतकऱ्यांबद्दलचे विधान सत्तेचा माज आल्याचे दर्शवते. शेतकरी भिकारी नाही तर शेतक-यांसह सर्वसामान्य जनतेला जीएसटीच्या माध्यमातून लुटणारे भाजपा युती सरकारच भिकारी आहे, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानाचा समाचार घेत नाना पटोले म्हणाले की, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे त्याचा अपमान करणे ही विकृती आहे. भाजपा युती सरकार हे शेतकरी विरोध असून फक्त धनदांडग्यांसाठी काम करत आहे. सरकार एक रुपयात पीक विमा देते म्हणजे शेतकऱ्यांवर उपकार करत नाही आणि हे पैसे माणिकराव कोकाटे त्यांच्या खिशातून देत नाहीत. सरकार शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देत नाही, कर्जमाफी देत नाही. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना भरमसाठ आश्वासने देऊन भाजपा युतीने मतांची भिक मागितली. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या कृषी साहित्यावर १८ टक्के जीएसटी लावून सरकार शेतकऱ्यांकडूनच भिक घेते आणि वरून शेतकऱ्यांनाच भिकारी म्हणते.
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, शेतकऱ्यांच्या नावावर विविध योजनांमध्ये कृषी मंत्रालय कशी मलई खाते याचा पर्दापाश नुकताच आम्ही केला आहे. पीक विमा योजनेतही भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्र्यांची हकालपट्टी करावी अशी मागणीही यावेळी केली.
Marathi e-Batmya