मुंबईः प्रतिनिधी
भाजपा, एनसीबी आणि काही गुन्हेगार मिळून या मुंबईत दहशत माजवत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.
दरम्यान महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी याचा वापर कसा केला जातोय याचे पुरावे पुढच्या आठवड्यात देणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
इलेक्ट्रॉनिक पुराव्यावर एनसीबी चालत आहे. समीर वानखेडे यांचा मोबाईल व व्हॉटस्ॲप चॅट चेक करा. फोन रेकॉर्डिंग जर रिलीज झाली तर सर्व केस कशा बोगस आहेत. मुंबईत जो फर्जीवाडा केलाय तो समोर येईल असेही ते म्हणाले.
पूर्वी रेव्ह पार्टी जेव्हा – जेव्हा झाल्या आहेत त्या – त्या वेळी जे संशयित सापडत होते त्यांची रक्त व लघवी नमुन्यासाठी घेऊन संशयितांना सोडले जायचे. त्यानंतर त्यांचा नमुना पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना अटक करून कोर्टात हजर केले जात होते. मात्र या वर्षभरात एनसीबीने ज्यांच्यावर आरोप लावले किंवा ज्यांना अटक केली त्यांचे कोणतेही रक्त किंवा लघवीचे नमुने घेतलेले नाही. ज्या आरोपींना ताब्यात घेतले जात आहे त्यांचे नमुने पॉझिटिव्ह येणार नसल्याने त्यांची नमुना टेस्ट केली जात नाही. फक्त व्हॉटस्ॲप चॅट आधारावर त्यांना आरोपी ठरवले जाते आहे. त्यांच्या केसेस खोट्या असल्यानेच ते नमुने घेत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
आज आर्यन खानला जामीन नाकारला आहे. युक्तीवाद झाला आहे त्यावरून निर्णय झाला पाहीजे होता. आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे असं सांगून जामीन मिळू दिला जात नाही. लोकांना जास्त त्रास कसा द्यायचा आणि जामीन मिळवू द्यायचा नाही. काही लोकांना जामीन मिळू देण्यासाठी प्रयत्न करायचा आणि काही ना जामीन मिळू द्यायचा नाही अशी टीका करत आर्यन खान प्रकरणातील जे सर्व काही पुरावे आहेत ते समीर वानखेडे यांच्या कार्यालयातील आहे. प्रत्यक्ष कारवाई कुठे ही झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
एनसीबीच्या ९० टक्के केसेस फेक असल्याचा गंभीर आरोप करत एनसीबीचा राजकीय वापर सुरु असल्याचे सांगत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नावाखाली खंडणी मागत असल्याची तक्रार वर्सोवा येथे एप्रिल मध्ये दाखल झाली आहे. त्याचा तपास झाल्यास सर्व काही समोर येईल. वर्षभरात ज्या एनसीबीने कारवाई केल्या त्यांची न्यायिक चौकशी करा मोदी साहेब अशी मागणी त्यांनी केली.
भाजपा एनसीबी आणि काही क्रिमिनल लोक दहशत माजवत असल्याचा आरोप मलिक यांनी करत पुढील आठवड्यात मी हे सर्व समोर आणणार असल्याचा इशारा देत त्यासंदर्भात माझ्याकडे काही पुरावे ही असल्याचे त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya