भुजबळ म्हणाले, पाटीलबुवांनी ते काम सुरु केलेय, तर सोमय्यांची काळजी घेणे पोलिस… पाच राज्यातील निवडणूकीच्या भाकितावरून भुजबळांचा टोला

मराठी ई-बातम्या टीम

पाच राज्यातील विधानसभा निवडणूका सध्या सुरु आहेत. यापार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना त्या राज्यांमध्ये कोण सत्तेवर येणार असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी काय भविष्यकार आहे का? त्या चंद्रकांत पाटलांनी सध्या भविष्यकामं सुरु केलं आहे. पूर्वी जोशीबुवा भविष्य सांगायचे, आता पाटीलबुवा सांगतायत. मी तर भाजीवाला माणूस असे सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना  उपरोधिक टोला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ नाशिकमधील येवला येथे विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच पाच राज्यांमध्ये भाजपाला यश मिळेल का माहिती नाही. मात्र सत्तेत लोकशाही मानणारे लोक हवेत असे मत व्यक्त केले. तसेच मोदी सरकारवर जोरदार टीकाही केली.

भाजपाने काही काम केले नाही. त्यांना पंडित नेहरुंना शिव्या घालण्याशिवाय दुसरा काही धंदा राहिलेला नाही. सगळा देश विकून टाकण्याचे काम सुरु आहे. फक्त विरोधी पक्षाविरोधात यंत्रणा कामाला लावत असून हे लोकशाहीत योग्य नाही. त्यामुळे लोकशाही मानणारे सत्तेत हवेत असे मतही  त्यांनी यावेळी व्यक्त केले.

उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या कोर्लई गावातील बंगले पाहण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या गेले होते. यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, संजय राऊत यांनी बस करुन जाऊ असं म्हटलं आहे. काल मी काही प्रसारमाध्यमांमध्ये पाहिलं तर त्यात बंगले दिसत नव्हते. पडलेल्या भिंती दिसत होत्या.

भुजबळांच्या घराची पाहणी केल्याप्रकरणी किरीट सोमय्या यांना नोटीस देण्यात आली आहे. त्याविषयी विचारले असता ते म्हणाले की, सांताक्रूझ येथे पुनर्बांधणीत बांधलेली इमारत आहे. किरीट सोमय्या काही लोकांसह त्या घरी गेले होते. पोलिसांनी कोरोना असल्याने गर्दी करु नये अशी विनंती केली होती. त्यांनी ऐकलं नव्हतं म्हणून नोटीस बजावण्यात आली आहे. किरीट सोमय्या राज्यातील आणि देशातील प्रसिद्ध नेते असल्याने त्यांची तब्येत बिघडू नये हे पोलीस आणि सरकारचं काम असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लागवला.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *