राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर वैयक्तिक पातळीवर अंत्यत हिन भाषेतील एक पोस्ट अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या फेसबुक प्रोफाईलवर शेअर केल्याप्रकरणी तीला काल ठाणे पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने तिला १८ तारखेपर्यत पोलिस कोठडी दिली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कायदा योग्य ते काम करेल, मी काय बोलणार? एक तर मी ओळखतही नाही तिला (केतकी चितळेला), मात्र कुणाच्याही वडिलांबद्दल किंवा कुठल्याही व्यक्तीबद्दल त्याने मरावं असं कोणी बोलतं का? कुठल्या संस्कृतीत हे बसतं? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला.
शरद पवारांवर करण्यात आलेल्या या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसहीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या टीकेची भाषा योग्य नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. या निषेधासाठी सुप्रिया सुळेंनी या तिन्ही नेत्यांचे आभार मानले. यानिमित्त मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या तिघांचेही जाहीर आभार मानते. त्यांनी या कृतीच्या विरोधात भूमिका घेतली, यातून मराठी संस्कृती दिसते. आम्ही सगळ्यांनी मिळून यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. कधीही दुसऱ्या कोणावर जर वेळ आली तर मी स्वत: त्या कृतीच्या विरोधात उभा राहीन. कारण, ही जी विकृती सुरू झालेली आहे, ती समाजासाठी वाईट आहे. आज ती आमच्याबद्दल झाली उद्या ती तुमच्याबद्दल होऊ शकते. अशी जी प्रवृत्ती आहे तिचं जगातील कुठल्याही समाजात कोणीचं समर्थन करु शकत नसल्याचं त्या म्हणाल्या.
याचबरोबर पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या वाढत्या दराच्या पार्श्वभूमीवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझी पंतप्रधानांना विनंती आहे की त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक घ्यावी. सगळं राजकारण बाजूला ठेवून आज महागाईवर सगळी राज्ये आणि केंद्र सरकार एक देश म्हणून आपण काय करू शकतो, यावर चर्चा करणे हे आता काळाची गरज आहे. हे मी मागील जवळपास तीन महिने आणि संसदेतील दीड महिन्यातील सगळ्या भाषणात बोलत आहे.
केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवायांवरून बोलताना सुप्रिया सुळेंनी म्हटले की, अनिल देशमुखांना अटक करून अनेक महिने झाले आहेत. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. आरोप करणारा माणूस गायब आहे आणि त्यांच्यावर १०९ वेळा रेड करण्याचा विक्रम केंद्र सरकारने केला आहे. १०९ वेळा जर तुम्हाला रेड करावी लागत आहे, तर मग १०८ वेळा तुम्ही काय केलं? यांना काहीच नाही मिळालं म्हणून तर त्यांना इतक्या वेळेला रेड करावी लागत असल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
Marathi e-Batmya