राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे त्यामुळे अजित पवार यांनी कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.
महेश तपासे बोलताना पुढे म्हणाले की, आता अजित पवार म्हणू शकणार नाही की गुन्हा सिद्ध होऊ द्या. आता तर कृषी मंत्री यांच्यावर गुन्हा ही सिद्ध झाला असून जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे. भाजपा प्रणित सरकारने नैतिकतेचे उत्तम उदाहरण देता कोकाटे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा अशी मागणीही केली.
पुढे बोलताना महेश तपासे म्हणाले, शिंदे सरकारची लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्या उत्कृष्टतेसाठी कधीच नव्हती, ती फक्त निवडणुका जिंकण्यासाठी योजना होती. आता राज्य सरकारला लाडक्या बहिणींचा विसर पडला असून एक एक नवीन निकष लावत लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचा डाव राज्य सरकारकडून आखण्यात येत आहे. अशाप्रकारे लाडक्या बहिणीची घोर फसवणूक विद्यमान सरकारने केल्याचा आरोप करत राजकीय फायद्यासाठी लागू करण्यात आलेल्या या योजनेसाठी दरवर्षी ४५ हजार कोटी कुठून आणायचे असा प्रश्न आता वित्तमंत्री अजित पवार यांना पडलाय. लाडक्या बहिणीची मतं घेताना जे भरभरून आश्वासन देत होते तेच आता जाचक अटी लावून भगिनींची संख्या कमी कशी करता येईल याच्या शोधात असल्याचा टोलाही यावेळी लागवाला.
लाडकी बहिण योजनेवरून टीका करताना महेश तपासे म्हणाले की, वास्तवात लाडक्या बहिणींची काळजी राज्य सरकारला नाही. राज्यात महिलांविरोधात मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच महिला व तरुणी मोठ्या प्रमाणात बेपत्ता होत आहेत, मात्र राज्य सरकारला या संदर्भात काहीही पडलेलं नाही. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत असताना या संदर्भात राज्य सरकार कुठलेही ठोस पावलं उचलत नाही. महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासंदर्भात सध्याच्या विद्यमान सरकारकडे कुठलेही व्हिजन नाही असा आरोपही यावेळी केला.
शेवटी बोलताना महेश तपासे म्हणाले की, २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी निवड व आग्रह शरदचंद्र पवार यांनी केला व ती निवड भविष्यकाळात योग्य ठरली व देश पातळीवर उद्धव ठाकरे यांचे कौतुक झाले. मात्र विद्यमान सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेले कंत्राट भाजपा आता थांबत आहे व चौकशी लावत आहे. भाजपासाठी आता एकनाथ शिंदे यांची उपयुक्तता संपली व त्यामुळे असं घडत असल्याचा उपरोधिक टीकाही यावेळी केली.
Marathi e-Batmya