Breaking News

शरद पवार यांनी स्पष्ट शब्दात दिला मोदी सरकारला इशारा ‌‌तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा व शिंदे गटाच्या काही नेत्यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने आज मुंबईत ‘महामोर्चा’चं आयोजन केले. या मोर्चाला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते, पदाधिकारी आणि लाखो कार्यकर्ते उपस्थित आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेला संबोधित करताना केंद्र सरकारला थेट इशारा दिला.

यावेळी शरद पवार म्हणाले, केंद्र सरकारने राज्यपालांची लवकरात लवकर हकालपट्टी केली नाही, तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पवारांनी दिला.

महाराष्ट्राच्या सन्मानासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येनं लोक येथे आले आहेत. आज ज्यांच्या हातात राज्याची सूत्रं आहेत, ती लोक महाराष्ट्रातील महापुरुषांबाबत वेगळ्या प्रकारची भाषा वापरत आहेत अशी आरोपही त्यांनी केला

स्वतंत्र्य भारताला आत्मविश्वास देण्याचं ऐतिहासिक काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. या देशात अनेक राजे होऊन गेले. अनेकांची संस्थाने झाली, पण मागील साडेतिनशे वर्षांपासून सामान्य माणसांच्या अंतकरणावर एकच नाव अखंड आहे, ते नाव म्हणजे हिंदवी स्वाराज्याची स्थापना करणारे ‘शिवछत्रपती’. अशा शिवाजी महाराजांचा आक्षेपार्ह उल्लेख राज्याचा एखादा मंत्री करतो, अन्य कुणी सत्ताधारी पक्षाचे घटकपक्ष करतात. हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. ही भावना तीव्र करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं तुम्ही इथे आला आहात. यातून राजकर्त्यांनी बोध घेतला नाही, तर लोकशाहीच्या मार्गाने त्यांना धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही. याबद्दलची खात्री मला स्वत:ला आहे, असा इशाराही शरद पवार यांनी दिला.

महाराष्ट्राची काही वैशिष्ट्ये, काही सन्मानचिन्हे आहेत. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा कर्मवीर भाऊराव पाटील हे सर्वजण आपल्या सन्मानाची आणि आदराची स्थानं आहेत. पण आजचे राज्यकर्ते या महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलतात. महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल मी कधीही पाहिला नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेत जाऊन मला ५५ वर्षे झाली, या काळात मी अनेक राज्यपाल पाहिले. या लोकांनी महाराष्ट्राचं नावलौकिक वाढवण्याचं काम केलं. पण यावेळी अशी एक व्यक्ती याठिकाणी आली आहे. जी महाराष्ट्राच्या एकंदरीत विचारधारेला संकटात नेण्याचं काम करत आहे. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल राज्यपालांनी बाष्कळ उद्गार काढले आहेत. त्यांना शरम वाटली पाहिजे अशा शब्दात शरद पवार यांनी सुनावले.

महात्मा फुलेंनी सर्वसामान्य माणसाला संघटित करण्यासाठी, आधुनिक विचार देण्यासाठी, परिवर्तन घडवण्यासाठी स्त्री शिक्षण आणि ज्ञानदानाचं काम केलं. अशा सामाजिक कामासाठी पुढाकार घेणारा एक थोर नेता म्हणून महात्मा फुलेंना संपूर्ण देशात ओळखलं जातं. मी जेव्हा बिहार, उत्तर प्रदेश किंवा इतर काही ठिकाणी जातो, तिथेही महात्मा फुलेंचं नाव आदराने घेतलं जातं. अशा नेत्याबद्दल राज्यपालांकडून टिंगलटवाळी केली जात असेल तर त्यांना राज्यपाल पदावर बसण्याचा अधिकार नाही. या मोर्चाच्या माध्यमातून लोकशाहीच्या मार्गाने मी केंद्र सरकारला संदेश देतो की, राज्यपालांची हकालपट्टी लवकरात लवकर करा. आज लोक शांततेत आहेत. पण तुम्ही ही हकालपट्टी वेळेत केली नाही, तर हा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *