ओबीसी आरक्षणाच्या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (शरदचंद्र पवार पक्ष) हेतुपुरस्सर डावलण्यात आले, असा घणाघाती आरोप पक्षाचे नेते राज राजापूरकर यांनी आज केला. एका बाजूला बैठकीचे निमंत्रण न देता चर्चेपासून दूर ठेवायचे आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार पक्ष ओबीसींच्या प्रश्नावर लढत नाही, असा खोटा प्रचार करायचा, ही सरकारची दुटप्पी भूमिका असल्याची टीका राजापूरकर यांनी केली आहे.
आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध ओबीसी संघटना आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीचे संदर्भ देत राज राजापूरकर म्हणाले, “मुख्यमंत्री महोदयांनी अनेक संघटनांना आणि पक्षांना निमंत्रण देऊन बोलावले. पण आमच्या पक्षाच्या एकाही प्रतिनिधीला किंवा लोकप्रतिनिधीला या चर्चेसाठी निमंत्रण पाठवण्यात आले नाही. हा लोकशाहीचा अपमान आहे.
सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राज राजापूरकर म्हणाले, एकीकडे ओबीसी आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर आम्हाला चर्चेत सहभागी करून घ्यायचे नाही आणि दुसरीकडे माध्यमांसमोर जाऊन शरद पवार साहेब किंवा आमचा पक्ष ओबीसी हितासाठी सहभागी होत नाही, अशी चुकीची माहिती पसरवायची, हा दुतोंडीपणा असल्याची टीकाही केली.
पुढे बोलताना राज राजापूरकर म्हणाले की,भाजपाने “मंडल यात्रेच्या माध्यमातून भाजपाचा ओबीसी आरक्षणाविरोधातील खरा चेहरा देशासमोर आला होता. तोच चेहरा लपवण्यासाठी आज आमच्या पक्षाला या चर्चेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे. जर आरक्षणाचे खरे मारेकरी कोणी असतील, तर ते भाजपाचेच लोक आहेत, असा आरोपही केला.
शेवटी बोलताना राज राजापुरकर म्हणाले की, जर सरकार खरे बोलत असेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या पक्षाच्या कोणत्याही प्रतिनिधीला पाठवलेले निमंत्रण पत्र माध्यमांसमोर सादर करून दाखवावे, असे आव्हान सरकारला दिले.
Marathi e-Batmya