Breaking News

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, चैत्यभूमीपासून आरक्षण बचाव यात्रा मराठा आणि ओबीसी आरक्षण प्रश्नी २५ जुलै रोजी यात्रेला सुरुवात

सर्व ओबीसी घटकांची मागणी होती की, वंचित बहुजन आघाडी भूमिका मांडत आहे ती गावोगावी गेली पाहिजे. पक्षाच्या वतीने आम्ही ठरवले की, या सामाजिक संघटनांना सोबत घेऊन २५ जुलैला दादर, चैत्यभूमी येथून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात करायची आणि त्याच दिवशी फुलेवाडा येथे जायचे. २६ तारखेला राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची घोषणा केली होती. तेव्हा राजर्षी शाहू महाराजांना नतमस्तक होऊन आरक्षण बचाव जनयात्रा काढण्याचे आम्ही ठरवले असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत केली.

२५ जुलैला मुंबईतील चैत्यभूमी आणि पुण्यातील फुलेवाड्याला अभिवादन करून ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रभर काढण्यात येणार आहे.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जरांगे पाटील यांनी आपले आंदोलन सुरू केले आहे. दुसऱ्या बाजूस सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्या सर्वपक्षीय बैठकीला सर्व मराठा नेते राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे कोणीच उपस्थित नव्हते. त्यामुळे त्या बैठकीत नेमकी राजकीय पक्षाची भूमिका काय हा प्रश्न वंचित बहुजन आघाडीकडून विचारण्यात आला असल्याचे या वेळी सांगत सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांना वंचित बहुजन आघाडीकडून विनंती करण्यात आली होती की, सर्व राजकीय पक्षांना व्यक्तिगत पत्र लिहावे. जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की, मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्यावे या बाबत राजकीय पक्षांची भूमिका काय आहे या संदर्भात विचारणा करावी. पण अजून वंचित बहुजन आघाडीला ते पत्र मिळालेले नाही. श्रीमंत मराठ्यांचे जे पक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा आणि उध्दव ठाकरेंची शिवसेना हे जोपर्यंत भूमिका मांडत नाहीत तोपर्यंत तोडगा निघणार नाही असेही यावेळी सांगितले.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, आरक्षण बचाव यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी कॉर्नर बैठका घेतल्या जातील. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत. ओबीसींचे आरक्षण वाचले पाहिजे, sc/st विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे, ओबीसींच्या विद्यार्थ्यांना सुद्धा sc/st प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते ती जशीच्या तशी लागू झाली पाहिजे. जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच आहे. आरक्षणाच्या माध्यमातून sc/st आणि ओबीसींना सुद्धा पदोन्नती मिळाली पाहिजे, अशा प्रमुख मागण्या या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, श्रीमंत मराठ्यांनी तुम्हाला आतापर्यंत फसवलेले आहे. त्यांनी टिकाऊ आरक्षण दिले नाही. तेव्हा ओबीसींच्या आणि आरक्षणवाद्यांच्या हातात सत्ता द्या, त्या सत्तेचा उपयोग हे गरीब मराठ्यांच्या टिकाऊ आरक्षणाचे ताट वेगळं करून देण्याचे आश्वासन आम्ही देणार असल्याचेही स्पष्ट करत मराठ्यांना आरक्षण न देणे हा श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे. त्यामुळे आंदोलन हे इथल्या श्रीमंत मराठ्यांच्या विरोधात झाले पाहिजे, अशी स्पष्ट भूमिकाही यावेळी मांडली.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, मी मराठा आरक्षणाचा तोडगा आता मांडणार नाही. कारण आता मांडला तर त्या तोडग्याचा खिमा केल्याशिवाय हे राहणार नाहीत. म्हणून सत्ता आल्यानंतर तो आम्ही मांडू असे मागे मी म्हणालो होतो. आरक्षण बचाव यात्रेत येण्यासाठी आम्ही कोणालाही नाही म्हणत नाही. छगन भुजबळांना यायचे असेल, मुंडेंना यायचे असेल, हाकेंना यायचे असेल तर ते येऊ शकतात. तसेच, अन्य ओबीसी संघटनांनाही आम्ही बोलावले असल्याचेही यावेळी सांगितले.

राज्यातील मराठा-ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, स्फोटक परिस्थिती होत चालली आहे, ती अजून होऊ नये, शांतता राहिली पाहिजे. ओबीसी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. पण भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी अजून भूमिका घेतल्या नाहीत. यांनीही भूमिका घेतल्या पाहिजेत, जेणेकरून स्फोटक परिस्थिती शांत करता येईल आणि गावगाडा पूर्ववत होईल यासाठी आम्ही ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आयोजित केल्याचेही यावेळी सांगितले.

आरक्षण बचाव यात्रेबाबत सांगताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ही ओबीसी आरक्षण बचाव यात्रा २५ जुलै रोजी दादर चैत्यभूमीपासून सुरू होऊन पुणे महात्मा फुलेवाडा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना असे होत औरंगाबाद येथे या यात्रेचा समारोप होणार असून औरंगाबाद येथे या यात्रेचे मोठ्या सभेत रूपांतर होणार असल्याचेही यावेळी सांगितले.

Check Also

पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांचे न्यायिक काम परभणीतून

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण व गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच हिंगोली स्वतंत्र न्यायिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *