अजित पवार यांनी केलेल्या “सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार?” या विधानावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका करताना म्हणाले की, “अजित पवार, तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात असे वाटते का? असा सवालही यावेळी केला.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकरी आजही अवकाळी पावसामुळे, पिकांच्या नुकसानीमुळे आणि शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे मोठ्या अडचणीत आहेत. हे शेतकरी कठोर परिश्रमाने अन्न पिकवतात, पण तुमचे सरकार त्यांच्या कष्टाची परतफेडही करू शकत नाही, असेही यावेळी सांगितले.
प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, सोयाबीनसाठी सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल ५,३२८ रुपये असूनही शेतकऱ्यांना फक्त ३,५०० ते ४,००० रुपये भाव मिळत आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांना जवळजवळ ३० टक्के तोटा सहन करावा लागत आहे. कापसाची स्थितीही तितकीच गंभीर असल्याचा आरोपही यावेळी केला.
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, अवकाळी पावसाने राज्यातील २९ जिल्ह्यांतील ६८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने मदत जाहीर केली असली तरी एक पैसाही शेतकऱ्यांच्या हातात पोहोचलेला नाही. शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात घालवली, आणि त्यांच्या आशाही पावसात वाहून गेल्या अशी टीकाही यावेळी केली.
सरकारच्या निष्क्रीय भूमिकेवर टीका करत प्रकाश आंबेडकर म्हणाले, तुमच्या सरकारला शांत झोप मिळावी म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात का? शेतकऱ्यांना भिक नको, त्यांना त्यांचे हक्क हवेत असेही यावेळी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीने अजित पवार यांच्या शेतकरीविरोधी विधानाचा तीव्र निषेध नोंदवला असून, राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली.
Marathi e-Batmya