मुंबई: प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ अकलूजमध्ये झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला मागासवर्गीय असल्यानेच काँग्रेस टीका करत असल्याचा आरोप केला. पण याच भाजपने देशाचे राष्ट्रपती असलेल्या रामनाथ कोविंद यांना मंदीरांना भेटी देताना पुजाऱ्यांकडून गाभाऱ्यात प्रवेश देण्यास नकार देत होते. त्यावेळी पंतप्रधान काय करत होते असा खोचक सवाल काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.रत्नाकर महाजन यांनी केला.
निवडणुकीच्या राजकारणात जाती-धर्माच्या नावावर मतदारांना आवाहन करण्याचा संघ परिवार व भाजपाची फार जुनी सवय आहे. २०१४ प्रमाणे याहीवेळी नरेंद्र मोदी आणि भाजपाने तेच करायचे ठरवलेले दिसते. मोदी यांनी अकलुजच्या भाषणात आपण मागासवर्गीय असल्यामुळे काँग्रेस टीका करत असल्याचे म्हटले आहे, हा त्याचाच पुरावा असल्याची टीकाही त्यांनी केली.
राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांची जात काढल्यामुळे संघ परिवाराच्या नाकाला फारच मिरच्या झोंबल्या. पण याच राष्ट्रपतींची उमेदवारी जाहीर करताना मात्र भाजपाच्या तडीपार अध्यक्षांनी स्वतः रामनाथ कोविंद यांची जात जाहीर केली होती. हे अजून कोणी विसरलेले नाही. पण हेच राष्ट्रपती जेव्हा वेगवेगळ्या मंदिरात जात होते, तेव्हा तिथले पुजारी त्यांना देवळाच्या गाभाऱ्यात प्रवेश करु देत नव्हते. तेव्हा संघ परिवार आणि भाजपाने ते कसे चालू दिले. आज दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचा पुळका आलेल्या पंतप्रधानांनी तेव्हा काय केले? असा सवाल ही त्यांनी केला.
Marathi e-Batmya