राज ठाकरे यांची आरएसएसच्या १०० निमित्ताने खास पोस्ट; नवे समीकरण? शिवसेना उबाठा पक्षाला असलेली सहानभूती मनसेकडे खेचण्याचा प्रयत्न

मागील अनेक वर्षापासून हिंदूत्वाच्या प्रश्नावरून भाजपाशी पूर्वीच्या शिवसेनेशी युती असल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वंयसेवक संघ अर्थात आरएसएसने नेहमीच शिवसेनेच्या बाजूने आणि शिवसेनेनेही आरएसएसशी चांगले सौहार्दाचे संबध जपले आहेत. मात्र आता शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर शिवसेना उबाठा गटाने अनेक वेळा आरएसएस आणि भाजपावर सतत टीका सुरु केली आहे. त्यावर अद्याप आरएसएसने उघडपणे प्रत्युत्तर दिलेले नाही. मात्र आरएसएसच्या स्थापनेला ९९ वर्षे पूर्ण होत शंभरीत पदार्पण केले. यापार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आरएसएसच्या १०० री निमित्त एक्सवर एक पोस्ट लिहीत खास कौतुक केले.

मनसे प्रमुख राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये पुढे बोलताना म्हणाले की, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन. ९९ वर्ष पूर्ण करत शंभरीत या संघटनेने पदार्पण केलं. याबद्दल प्रत्येक संघ स्वयंसेवकाचं मनापासून अभिनंदन. भारताला आपली मातृभूमी मानणारे सगळे हिंदू आहेत आणि या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे उद्दिष्ट घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व याचा अभिमान समाजामध्ये व्हावा यासाठी गेली ९९ वर्ष संघाने निःसंशय मोठं काम केल्याबद्दल संघाचे कौतुक केले.

तसेच राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, संघाचं काम मला कायमच अचंबित करतं. देशात कोणीतही नैसर्गिक आपत्ती आली तर तिथे तात्काळ धावून जाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अग्रेसर असतो, हे मी अनेकदा पाहिलं आहे. संघातील बर्‍याच स्वयंसेवक व प्रचारकांशी माझा संवाद आहे. देशाच्या दुर्गम भागांमध्ये जाऊन काम करणं, तिथे भारतीयत्वाची, राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणं, यांसाठी त्यांना किती संघर्ष करावा लागतो याचा तपशील मला माहित असल्याचंही यावेळी सांगितले.

राज ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, मुळात एका विचाराला घट्ट धरून ठेवत, एखाद्या संघटनेने १०० वर्ष काम करावं हे सोपं नाही. जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना १०० वर्ष टिकली असेल आणि तरीही तिचा विस्तार सुरु असेल आणि ती कार्यशील असेल. ही संघटना कायम जागृत ठेवणाऱ्या सर्व संघ स्वयंसेवकांना माझ्या अतिशय मनापासून शुभेच्छा देत हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व रुजवण्यासाठी धडपडणारा प्रत्येक घटक, विचार हा असाच तेवत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खास शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, शिवसेना उबाठा गटाने भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघासोबत काहीशीही ताणली गेलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर आणि राज ठाकरे यांचा मागील काही दिवसांपासून भाजपासोबत सुरु असलेल्या प्रेममयी संबधाच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपाबरोबर आरएसएसचा पाठिंबा मिळविण्यासाठी हा मुद्दाम कौतुक सोहळ्याची पोस्ट लिहिल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपा आणि आरएसएस किती मनसे मदत करणार हे लवकरच समजेल अशी कुत्सित चर्चाही यानिमित्ताने सुरु झाली आहे.

About Editor

Check Also

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत संदीप शेळकेंचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश.. फडणविसांच्या पोटातील ओठावर आले; ‘गेट वेल सून, फडणवीस’

बुलढाणा जिल्ह्यातील धडाडीचे नेते संदीप शेळके यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *