राज ठाकरे यांची मनसैनिकांना पत्र, तूर्तास आंदोलन थांबवा मराठीच्या भाषेच्या आंदोलनावरून केले आवाहन

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बोलताना मराठी भाषेवरून मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेण्याचे आवाहन करत मुंबईत आणि महाराष्ट्रात येणाऱ्यांना मराठी भाषा आलीच पाहिजे, तसेच मराठी भाषेचा सन्मान राखलाच गेला पाहिजे असा इशारा देत सर्व कार्यालयातून मराठी भाषेतून कामकाज चालले पाहिजे असे सांगत त्यासाठी आग्रह धरण्याचे आवाहन केले. त्यातच नुकतेच कर्नाटकातील कन्नड राष्ट्रवेदिकेने मनसेच्या या आंदोलनाला पाठिंबा जाहिर केला. मात्र या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसैनिकांना खुले पत्र लिहित तूर्तास आंदोलन थांबविण्याचे आवाहन केले आहे.

राज ठाकरे यांनी मनसैनिकांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, सर्व प्रथम मराठीच्या मुद्यासाठी महाराष्ट्रात तुम्ही पुन्हा एकदा जो काही आवाज उठवलात त्यासाठी तुमचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. मी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की, महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठी भाषेत व्यवहार होतात की नाही ते पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसऱ्या दिवसापासून तुम्ही महाराष्ट्रातील सर्वदूर बँकामध्ये गेलात, तिथे मराठी भाषेचा आग्रह धरलात, हे उत्तम झालंः यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसंच महाराष्ट्र निवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकदही दिसली.

पुढे राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले की, पण आता हे आंदोलन थांबवायला हकत नाही, कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केली आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चूणूक दाखविली. आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि मराठी समाजानेच जर कच खाल्ली तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची असा सवालही यावेळी केला.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, आणि या सगळ्यात महत्वाची जबाबदारी सरकारची आहे. रिझर्व्ह बँकेचे नियम त्यांना माहित नाही आहेत आणि त्या नियमांची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे. काल कुठे तरी मुख्यमंत्री माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही. पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात तर मग रिझर्व्ह बँकेची नियमांची अंमलबजावणी करणं तुमचंच काम नाही का असा सवाल करत तुम्ही बँकाना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले.

शेवटी राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले की, त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो तुर्तास आंदोलन थांबवा पण मुद्यावरचं लक्ष हटू देऊ नका, सरकारलाही माझं सांगणं आहे की, परत जर कुठे नियम पाळला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील असा इशाराही यावेळी दिला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपाची मनुवादी काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील भारत वेगळा

देशात दोन विचारधारांची लढाई आहे, एक विचारधारा काँग्रेसची आहे तर दुसरी भाजपाची. काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *