Breaking News

रमेश चेन्नीथला यांचा आरोप, भाजपाला ४०० जागांचे बहुमत मिळाल्या… महायुती सरकारला बदलापूर घटनेचे गांभिर्य नाही- नाना पटोले

भारतीय जनता पक्ष व आरएसएस देशाला तोडू पहात आहेत पण राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा व भारत जोडो न्याय यात्रा काढून देशाला जोडण्याचे काम केले आहे. भाजपा आजही धर्म व जातीच्या आधारावर देश तोडण्याचे काम करत आहे. लोकसभा निवडणुकीत देशाच्या जनतेने लोकशाही व राज्यघटना वाचवली. ४०० जागांचे बहुमत मिळाले असते तर भाजपाने संविधान बदलले असते परंतु संविधानावरील धोका अजून टळलेला नाही, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीची उत्तर महाराष्ट्रातील तयारीची आढावा बैठक व पदाधिकारी मेळावा नाशिक येथे संपन्न झाला. या मेळाव्याला प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, खासदार शोभा बच्छाव, आमदार लहू कानडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, माजी मंत्री अनिस अहमद, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, शरद आहेर, राजाराम पानगव्हाणे, प्रदेश सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त, हेमलता पाटील, नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शिरीष कोतवाल, शहराध्यक्ष आकाश छाजेड, अहमदनगर शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरण काळे, मालगावचे शहर काँग्रेसचे अध्यक्ष इजाज बेग आदी उपस्थित होते.

यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. महिला,शाळकरी मुलींवरील अत्याचार रोखण्यात महायुती सरकार अपयशी ठरले आहे. बदलापुरची घटना अत्यंत गंभीर असून पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यासही विलंब लावला. महायुती सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड रोष आहे. बदलापूरच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सरकार विरोधात आवाज उठवावा, असे आवाहन प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले आहे.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, बदलापूरच्या जनतेच्या मनात चिड निर्माण झाल्याने उद्रेक झाला व त्यातून आंदोलन झाले पण निर्ढावलेल्या महायुती सरकारने त्यांच्यावरच गुन्हे दाखल करुन जेल मध्ये टाकले. बदलापूरच्या घटनेची उच्च न्यायालयाने स्वतः दखल घेऊन सरकारची खरडपट्टी काढली तरी सरकारला लाज वाटत नाही. महायुती सरकारला बदलापूरच्या घटनेचे गांभीर्यच नाही, राज्यातील सरकार आंधळे झाले आहे, लहान मुलीही सुरक्षित राहिलेल्या नाहीत असेही यावेळी सांगितले.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, जनता काँग्रेस व पुरोगामी विचाराच्या मागे आहे. धर्माचे नाव घेऊन कोणी राजकारण करणार असेल, राज्य घटनेला हात घालणार असेल तर चालू देणार नाही असा संदेश देशाला व उन्मत झालेल्या भाजपा सरकारला महाराष्ट्राच्या जनतेने दिला. लोकसभा निकालाने ५६ इंचाची छाती २६ इंच झाली. शेतीला कायम दुय्यम दर्जा देणारे लोक भाजपाचे आहेत, मध्यंतरी गारपीट झाली द्राक्षाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या पण त्याला नुकसान भरपाई दिली नाही अशा शेतकरी विरोधी भाजपा सरकारला धडा शिकवायचा आहे. नाशिक, नगर हे पुरोगामी विचाराला ताकद देणारे जिल्हे आहेत, या जिल्ह्यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ताकद दिली पाहिजे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले की, लोकसभेत काँग्रेस इंडिया आघाडी सक्षम विरोधी पक्ष असल्याने आता भाजपाला मनमानी करता येत नाही. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकासह चार विधेयके मोदी सरकारला मागे घ्यावी लागली, ही विरोधी पक्षाची ताकद आहे. आता विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्ताबदल केला पाहिजे. महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत ११ व्या क्रमांकावर आहे, गुजरात, तेलंगणा राज्य महाराष्ट्राच्या पुढे गेले आहेत. नाशिकमधून महाविकास आघाडीच्या १५ च्या १५ जागी विजय मिळवा आणि विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार आणा, राज्याचे गतवैभव परत आणू असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर तोफ डागली, ते म्हणाले की, विधिमंडळ अधिवेशनात उद्योगमंत्री श्वेतपत्रिका काढणार होते त्याचे काय झाले. हिम्मत असेल तर गुजरातला महाराष्ट्रातून किती उद्योग गेले त्याची श्वेतपत्रिका आता काढा, असे आव्हान त्यांनी दिले. राज्यात बेरोजगारी प्रचंड वाढली असून महाराष्ट्र अविवाहित बेरोजगारांचे राज्य झाले आहे.महायुती सरकार गुजरात चरणी लोंटागण घालत आहे. १५ वर्षात जेवढे टेंडर काढले नाहीत तेवढे या २ वर्षात खोकेबाज व धोकेबाज सरकारने काढल्याची टीका केली.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *