शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीला उपस्थित राहून दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच सूरत मार्गे गुवाहटीला रवाना झालेले शिवसेनेचे मंत्री उदय सांमत यांनी आज आपली भूमिका मांडली. उदय सामंत यांनी भूमिका मांडताना राज्यसभा निवडणूकीचा दाखला देत राज्यसभेत शिवसेनेचे संजय पवार हे आणखी एक सदस्य जाऊ नये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पराभूत करण्यासाठी प्रयत्न केला गेला असा गंभीर आरोप केला.
राज्यसभा निवडणूकीसाठी संभाजी राजे यांना शिवसेना पुरस्कृत म्हणून उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र ऐनवेळी आपण सर्वसामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिली. परंतु महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी संजय पवार यांना जाता येवू नये यासाठी बंदोबस्त केल्याचे ते म्हणाले.
शिवसेना पक्षात सध्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे उघड दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटात सुरुवातीला फक्त १३ ते १५ आमदार होते. आता मात्र ही संख्या ४० पेक्षा जास्त झाली आहेत. शिंदे गटात सामील झालेले आमदार सध्या हुवाहाटीला असून ते हळूहळू माध्यमांसमोर येत असून बंडाची कारणं सांगत आहेत.
राज्यसभा निवडणुकीसाठी आपण संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून तिकीट देणार होतो. पण आपण सर्वसामान्य शिवसैनिकाला तिकीट दिले. त्यानंतर या शिवसैनिकाला राज्यसभेत जाता येणार नाही यासाठी घटक पक्षांनी योग्य बंदोबस्त केला. अशाच पद्धतीने शिवसेना संपण्याचा प्रयत्न घटक पक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर केला.
घटक पक्षाच्या वाईट नजरेच्या विळख्यातून शिवसेनेला बाहेर काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जी मोहीम आखली आहे त्यात मी सहभागी झालो आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करुन घेऊ नये. मी शिवसेनेत आहे त्याचाच विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गुवाहाटीला गेल्यापासून सामंत यांच्या निष्ठेबाबत तर्कवितर्क लावले जात होते. याच कारणामुळे मी अजूनही शिवसेनेतच आहे. मला एक संभ्रम दूर करायचा आहे. मी शिवसेनेतच आहे. पण बाळासाहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आमच्या घटक पक्षांमुळे वाईट नजर लागली आहे. त्यांच्या वाईट नजरेतून शिवसेनेला बाहेर काढण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांचे समर्थन करण्यासाठी मी गुवाहाटीला आलो आहे. मला पदाधिकाऱ्यांना आवाहन करायचे आहे की कोणाच्याही गैरसमजांना बळी पडू नका. मी शिवसेनेत आहे. बाळासाहेबांची आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना टिकली पाहिजे असेही त्यांनी सांगितले.