मुंबईः प्रतिनिधी
स्वतः निवडून येण्याचा विश्वास आणि ताकद नसल्यानेच सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. परंतु शिवसेनेने पडणारा नेता नेला आम्ही शिवसेनेच्या तीन जागा कमी करु आणि राष्ट्रवादीची ताकद दाखवून देवू असा जबरदस्त विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी सचिन अहिर आणि शिवसेना यांच्यावर तोफ डागली.
सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला याचं पक्षाला आणि नेत्यांना दु:ख झाले आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो आणि त्याच्याकडून विश्वासघात होत असेल तर ती गोष्ट नक्कीच दु:ख करणारी आहे. सचिन अहिर शिवसेनेत गेले असले तरी त्यांच्यासोबत वरळीतील एकही कार्यकर्ता गेलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाने १५ वर्ष मंत्रीपद आणि १५ वर्षे मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती. परंतु मुंबईत विधानसभा निवडणुकीत यश मिळणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचा आरोपही त्यांनी केला.
सचिन अहिर शिवसेनेत गेले आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आम्ही नव्याने, ताकदीने पक्ष मुंबईत उभा करु आणि मुंबईत जास्तीत जास्त यश मिळवून देवू असा आत्मविश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पक्ष सोडला म्हणून दु:ख झाले नाही तर विश्वास टाकूनही विश्वासघात केल्याने दु:ख झाले. मात्र त्यांनी शरद पवारसाहेबांचे स्वप्न साकार केले नाही ते बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न काय साकार करणार आहेत. ते स्वतः चे स्वप्न साकार करण्यासाठी गेले असल्याची जोरदार टीकाही त्यांनी केली.
आम्ही पवार साहेबांचे कार्यकर्ते आहोत. त्या अनुषंगाने पुन्हा राष्ट्रवादी मुंबईत वाढवू . ९ ऑगस्ट क्रांती दिनी १० हजार लोकांची भव्य रॅली काढून षण्मुखानंद सभागृहात मेळावा घेवून पक्षाची ताकद दाखवली जाईल. मुंबईला जो नेता शरद पवारसाहेब देतील त्याच्या मागे यापुढे उभे रहायचे आहे. एक गेला म्हणून काही फरक पडत नाही असे आमदार हेमंत टकले यांनी ठणकावून सांगितले. मतलबासाठी, स्वार्थासाठी जो पक्ष सोडू शकतो अशा कृतघ्नता दाखवणाऱ्याला त्याची जागा दाखवून देवूया असे आवाहनही आमदार हेमंत टकले यांनी केले. यावेळी पक्ष कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून सचिन अहिर यांच्या शिवसेनेत जाण्याचा आनंदोत्सव साजरा केला.
सचिन अहिर शिवसेनेत गेल्यानंतर सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, कार्यालयात जमा झाले आणि त्यांनी पक्षासोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला. सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी त्यांच्यासोबत गेले नाहीत. यासंदर्भात एक महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये पुर्ण ताकदीने मुंबईत काम करण्याचे ठरविण्यात आले.
Marathi e-Batmya