नुकत्याच झालेल्या शिर्डीतील भाजपाच्या महाअधिवेशनात बोलताना भाजपाचे नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, १९७८ पासूनचे शरद पवार यांचे विश्वासघाताचे राजकारण संपविले असून राज्यातील मतदारांनी त्यांचे राजकारण २० फुट खोल खड्ड्यात गाडले असल्याची खोचक टीकाही केली.
अमित शाह यांच्या या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रत्युत्तर देत त्या व्यक्तीला गांभीर्याने घेत नाही. तसेच ते नोंद घेण्याची लेव्हलच नाही असे खोचक प्रत्युत्तरही दिले.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नी राज्यातील परिस्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.
शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले की, ज्या काळाचा उल्लेख त्यांनी केला. त्या काळाची सखोल माहिती त्यांनी घेतली असती तर अधिक बरे झाले असते. १९७८ साली मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री होतो. त्यावेळी ते गृहस्थ नक्की कोठे होते हे माहित नाही. माझ्या मंत्रिंडळात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, दुसरे नेते हशू अडवाणी असे जनसंघाचे नेते माझ्या मंत्रिमंडळात होते. १९७८ सालची पुलोद सरकारची माहिती घेतली तर महाराष्ट्रासाठी चांगलं योगदान दिलं. मी मुख्यमंत्री असताना उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. तर हशू अडवाणी हे नगरविकास खात्याचे मंत्री होते. माझ्या मंत्रिमंडळात कर्तृत्वान लोक काम करत होते असा टोलाही यावेळी अमित शाह यांचे नाव न घेता लगावला.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मी आणखी दोन नावं घेतो त्यांची पार्श्वभूमीवर जरी जनसंघाची असताना आम्हाला सहकार्य केलं. त्यात वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन याचं नाव घेऊ इच्छितो. हि सगळी नेतृत्वाची फळी १९७८ आणि त्यानंतरच्या काळात जरी पक्ष वेगवेगळे होते तरी त्यांच्यात संवाद होता. लालकृष्ण आडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे नावही घ्यावं लागेल. त्यांनी कधी अतिरेकी भूमिका घेऊन राजकारण केलं नाही. भूजला भूकंप झाला तेव्हा पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यात भूकंप, अतिवृष्टी सारखी संकट आली तर अशा आपतकालीन परिस्थितीत काय केलं पाहिजे यावर चर्चा केली. तसेच याबाबत शरद पवार याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे असेही अटलबिहारी यांनी सुचवलं होतं. अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना मी विरोधी पक्षाचा असतानाही मला मंत्रिपदाचा दर्जा देऊन आपतकालीन परिस्थितीबाबतचे काम करण्याची जबाबदारी सोपविली होती. ही पार्श्वभूमी अलिकडच्या लोकांना माहित नसावी. मी किंवा उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात जे उल्लेख झाले त्याबाबत मराठीत एक म्हण आहे कुठे इंद्राचा ऐरावत कुठे शाम भट्टाची तट्टाणी ही म्हण मला आठवत असल्याचे सांगत अमित शाह यांची खिल्ली उडविली.
शेवटी बोलताना शरद पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्याबाबतही त्यांनी काय भूमिका घेतली ते पाहिलं. त्यावर उद्धव ठाकरे त्यांचे मत मांडतील, पण हे गृहस्थ जेव्हा गुजरात मध्ये राहू शकत नव्हते, तेव्हा मुंबईत आले, बाळासाहेबांच्या घरी गेले होते. या गृहस्थांना सहकार्य करावं अशी विनंती बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. यापेक्षा अधिकची माहिती उद्धव ठाकरे देतील असे सांगत अमित शाह यांना त्यांच्या लेव्हलची आठवण करून दिली. तसेच अमित शाह यांच्या वक्तव्याची नोंद त्यांच्या पक्षातही घेतली जाणार नाही असं मला वाटतं असा टोलाही यावेळी लगावला.
Marathi e-Batmya