मुंबईः प्रतिनिधी
राज्याच्या मुख्यमंत्री पदी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र या दोघांच्या सरकारला बहुमताचे संख्याबळ नसून ते संख्याबळ शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजकिय आघाडीला असल्याचा दावा या तिन्ही पक्षांनी करत सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रित करावे अशी मागणी या तिन्ही पक्षांकडून करण्यात आली.
यावेळी शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील आदी उपस्थित होते.
राज्यात असलेली राष्ट्रपती राजवट अचानकपणे उठवायला लावून पहाटेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधीचा सोहळा उरकून घेतला. विशेष म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही यासंदर्भात रात्रीत अहवाल पाठवित त्यासाठी मदत केली. यासंपूर्ण प्रक्रियेच्या विरोधातच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून यावर उद्या मंगळवारी न्यायालय आपला निकाल देणार आहे.
तो निकाल काहीही लागण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच आज सोमवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेसच्यावतीने राज्यपाल कार्यालयात जावून सत्ता स्थापनेचा दावा करणारे पत्र सादर केले.

Marathi e-Batmya