मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील विधानसभेसाठी निवडणूका होत असून या निवडणूकीत भाजपा-शिवसेनेसोबत असलेल्या मित्रपक्षांना भाजपाने त्यांची जागा दाखविली अर्थात मित्रपक्षांना त्यांच्या उमेदवारांसाठी जागा दिल्याचा खुलासा करत आपल्या वक्तव्यातून निर्माण होणाऱ्या सूचक अर्थाची सारवा सराव करण्याचा प्रयत्न शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला.
ओबीसी, भटके-विमुक्त, धनगर, कुणबी, वंजारा, तेली, माळी, आगरी आदी समाजातील नेत्यांनी आपल्या विविध मागण्याप्रश्नी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेत त्यांना शिवसेनेला पाठिंबा दर्शविला. यानिमित्ताने माटुंगा येथील रंगशारदा सभागृहात आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.
भाजपाने मित्रपक्षांना १८ जागा देण्याचे कबुल केले होते. मात्र प्रत्यक्षात १४ जागाच दिल्या. रामदास आठवले यांच्या रिपाईने ११ जागा मागितल्या होत्या. त्यापैकी ५ जागाच त्यांना दिल्या. तर राष्ट्रीय समाज पार्टीने १४ जागांची मागणी केली होती. त्यांना केवळ २ जागा दिल्या. तर सदाभाऊ खोत यांच्या रयत संघटनेने तीन जागांची मागणी केली होती. त्यांनाही २ जागा दिल्या. तर विनायक मेटे यांनी त्यांच्या शिवसंग्राम संघटनेसाठीही ८ जागा मागितल्या होत्या. मात्र त्यांनाही भाजपाने २ जागा दिल्या. तसेच या मित्रपक्षांना जागा जरी दिलेल्या असल्या तरी रिपाई, रयत, शिवसंग्राम आदी पक्ष भाजपाच्या कमळाच्या चिन्हावर लढविणार आहेत. त्यामुळे या पक्षांचे विधानसभेत स्वतंत्र अस्तित्व दिसणार नाही.
यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांच्या वक्तव्याला महत्व आले आहे.
Marathi e-Batmya