उध्दव ठाकरे यांचा खोचक टोला, आमच्याकडे रद्दी वाढली म्हणून ती कागदपत्रे आयोगाला… निवडणूक आयोगाच्या एककल्ली कारभारावरून साधला निशाणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची पाहणी न करताच शिवसेना पक्ष नाव आणि पक्ष चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. त्यानंतर निवडणूक आयोगाचा निकाल एकांगी असून त्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे जाहिर केले. आज सोमवारी २० फेब्रुवारी रोजी शिवसेना भवनात आयोजित जिल्हाप्रमुखांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोग बरखास्त करा अशी मागणी करत आमच्याकडे रद्दी जास्त झाली होती म्हणून ती कागदपत्रे आयोगाला दिली नव्हती असा खोचक टोला लगावला.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, तुम्ही निर्णय कोणत्या अधिकारात दिला असा सवाल केला. त्यावर आयोग म्हणाला की आम्हाला जे कव्हरींग लेटर सादर करण्यात आहे होते. त्यात शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचा व्हिडिओचा उल्लेख नव्हता. तसेच पक्षाच्या घटनेला मान्यता दिल्याचे पत्रही दिल्याचा उल्लेख नसल्याचे सांगितले. त्यावर कपिल सिबल यांनी तुम्ही काय सगळे निर्णय कव्हरींग लेटर पाहुनच घेताय का? असा सवाल केला. बर आम्ही तो व्हिडिओ आणि त्यांच्या मान्यतेचे पत्र आयोगाला सादर केले ती सर्व माहिती खासदार अरविंद सावंत यांनी ट्विट करत आधीच जाहिर केलेली असल्याचेही स्पष्ट केले.

पुढे बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोगानं सांगितलेल्या फॉरमॅटनुसार आम्ही शपथपत्रे दाखल केली. पाऊस पडत असताना आम्ही सुरक्षित पद्धतीने सर्व प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे नेऊन दिली. आमच्याकडे रद्दी वाढली होती, म्हणून आम्ही ही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे दिली नव्हती. निवडणूक आयोगानेच आम्हाला सांगितलं होतं की, तुम्हाला तुमच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र सादर करावी लागतील. तसेच सदस्य संख्या दाखवावी लागेल. त्यानुसार आम्ही सर्व कागदपत्रं जमा केल्याचेही सांगितले.

निवडणूक आयोगाच्या निकालावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, जेव्हा या वादाला सुरुवात झाली, तेव्हा निवडणूक आयोगानं आम्हाला प्रतिज्ञापत्रं सादर करायला लावली होती. सदस्य संख्या दाखवा, असं सांगितलं होतं. मग मधल्या काळात चार-सहा महिने गेले. दरम्यान, शिवसेनेनं बोगस प्रतिज्ञापत्रं दिली अशा बातम्या आल्या. यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ठिकठिकाणी जाऊन शपथपत्रे तपासली. त्यामध्ये असत्य असं काहीच नाही, सर्व कागदपत्रे योग्य आहेत, असा अहवाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिला.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आम्ही लाखोंनी उपद्व्याप केल्यानंतर अचानक निवडणूक आयोग असं म्हणायला लागलं की, प्रतिज्ञापत्रं चालणार नाहीत. तुमच्या पक्षाकडून निवडून आलेल्या सदस्यांच्या बहुमतानुसार पक्ष कुणाचा हे ठरवलं जाईल. पण संबंधित आमदार पात्र आहेत की अपात्र आहेत, याचा निर्णय आधी व्हायला पाहिजे. जर तुम्हाला हाच निकष लावायचा होता, तर आम्हाला एवढी मेहनत का करायला लावली? आमच्या शिवसैनिकांना पदरमोड का करायला लावली? तुम्ही १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्रं लिहून का घेतली? असे सवालही केला.

यावेळी उध्दव ठाकरे यांनी हा सगळा घटनाक्रम बघितल्यानंतर आताचा निवडणूक आयोग बरखास्त झाला पाहिजे आणि निवडणुकीच्या प्रक्रियेनं निवडणूक आयुक्त नेमले पाहिजे, ही शिवसेनेची मागणी आहे. कारण हा निकाल मानायला मी तयार नाही. हा सरळ सरळ अन्याय आहे. काल-परवा अमित शाह महाराष्ट्रात येऊन गेले. त्यांनी एकनाथ शिंदेशी केलेल्या युतीला भाजपा-शिवसेना युती म्हटलं, पण ती युती ही नाहीये. ते चोरलेलं धनुष्यबाण आहे. हे शिवधनुष्य आहे, ते रावणाला पेललं नव्हतं. ते मिध्यांना कसं काय पेलणार? असा खोचक टोलाही लगावला.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, शासनाच्या आश्वासनानंतर संप मागे वाहतूकदारांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका

राज्यातील वाहतूकदार संघटनांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाची शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून त्यांच्या न्याय्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *