वाशिमः प्रतिनिधी
राज्यातील सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यातच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीसाठी भाजपकडून शिवसेनेला मिन्नतवाऱ्या करण्यात येत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी उध्दव ठाकरे हे आमचे मार्गदर्शक असल्याचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढल्याने भविष्यात भाजप-शिवसेना युती होणार असल्याचे शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथे संत सेवालाल महाराजांच्या स्मारकाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याहस्ते स्मारकाचे भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड आदी उपस्थित होते.
त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी संत सेवालाल स्मारकासाठी १०० कोटी रूपये देण्याची घोषणा करत संस्कृती संवर्धनासाठी स्वतंत्र अँकडमीही सुरु करणार असल्याची घोषणा केली.
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ही मराठा समाजाला आरक्षण देणारा कायदा लागू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे जाहीररित्या अभिनंदन केले.
प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. बंजारा समाज हा लढवय्या समाज आहे. या समाजाला आपण शिक्षणाची सुविधा दिली. तर ते देशाचा आधारस्तंभ होतील. संत सेवालाल महाराज हे केवळ बंजारा समाजाचेच नव्हते ते संपूर्ण जगाचे होते.
या कार्यक्रमाच्या आधी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासकिय प्रोटोकॉल तोडत उध्दव ठाकरे यांच्या भेटीला गेले. तसेच कार्यक्रमानंतर त्यांच्या गाडीतून प्रवासही केला.
Marathi e-Batmya