उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा सल्ला, ‘उद्योजक होताना टाटांचा आदर्श ठेवा’ रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा

आजच्या काळात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर ती पदवी रोजगारात रूपांतरित होणे आवश्यक आहे. आजच्या काळात तांत्रिक ज्ञानासोबतच सॉफ्ट स्किल्स आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता असणे ही यशाची गुरुकिल्ली मानली जाते. उद्योजक बनू इच्छिणाऱ्या तरुणांनी रतन टाटा यांचा आदर्श ठेवावा. नफा मिळवण्यासोबतच सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी, याचे टाटा हे उत्तम उदाहरण आहेत. प्रत्येक व्यक्तीची प्रगती ही समाजाची, राज्याची आणि पर्यायाने देशाची प्रगती असते असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा लोकभवन येथील दरबारहॉल येथे पार पडला, त्यावेळी या कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन बोलत होते. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपुर्वा पालकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त डॉ.अमित सैनी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.सतीश सुर्यवंशी यासह, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे विद्यार्थी उपस्थित होते.

उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन म्हणाले की, विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभातील पदवीधर हे इतिहासाचा भाग बनले आहेत. या विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यश मिळवले नसून, हे विद्यार्थी भारताला ‘ग्लोबल स्किल हब’ बनवण्याच्या प्रवासात एक मैलाचा दगड रोवणार आहेत. उद्योगांच्या मागणीनुसार अभ्यासक्रमात बदल होणे गरजेचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, ग्रीन एनर्जी आणि डेटा ॲनालिटिक्स यांसारख्या आधुनिक विषयांचा समावेश करून विद्यार्थ्यांना जागतिक आव्हानांसाठी तयार केले पाहिजे. दुसऱ्या महायुद्धानंतर नैसर्गिक संसाधने नसतानाही जपानने केलेली प्रगती ही त्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि शिस्तीमुळे आहे. काम करताना जपानी लोक कधीही विचलित होत नाहीत. हीच कामाप्रती निष्ठा भारतीय तरुणांनी अंगीकारली पाहिजे असेही सांगितले.

उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन म्हणाले की, उद्योजक बनू इच्छिणाऱ्या तरुणांनी रतन टाटा यांचा आदर्श ठेवावा. मुंबईतील वीज पुरवठ्याचे उदाहरण देत त्यांनी टाटांच्या जिद्दीचे कौतुक केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनला असून, आता तिसऱ्या क्रमांकाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. ही प्रगती साधताना तरुणांनी ‘स्किल इंडिया’ आणि ‘पीएम-दक्ष’ सारख्या व्यासपीठांचा लाभ घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला. आज ज्यांना पदवी मिळाली म्हणजे शिक्षण संपले असे नाही. आयुष्यभर नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवा. कॅम्पसच्या बाहेर स्पर्धेचे जग कठीण आहे, पण आत्मविश्वासाने संकटांचा सामना केल्यास यश तुमचेच आहे असेही सांगितले.
विद्यापीठांनी नाविन्यता, प्रयोगशीलता जपावी – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य, पुनर्कौशल्य आणि कौशल्य वृद्धी तीन महत्त्वाच्या पैलूंवर भर दिला आहे. रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठामध्ये या तिन्ही क्षेत्रांत साथ देण्याची क्षमता आहे. आधुनिक विद्यापीठांनी नाविन्यता, प्रयोगशीलता जोपासली पाहिजे. शिक्षणामुळे शाश्वत प्रगतीकडे जाण्यासाठी चारित्र्य आणि जबाबदारीची जाणीवही निर्माण झाली पाहिजे. पदवी मिळवणे म्हणजे शिक्षणाचा शेवट नाही. उलट, हा आयुष्यभर चालणाऱ्या शिकण्याच्या प्रवासाची सुरूवात आहे. ज्या जगात तुम्ही प्रवेश करत आहात ते अत्यंत गतिमान आणि सतत बदलणारे आहे. मध्यपूर्वेतील संघर्षांसह सध्याच्या भू-राजकीय घडामोडींचा जागतिक अर्थव्यवस्था आणि उपजीविकेवर आधीच परिणाम होत आहे, ज्यामुळे अनेक नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, विद्यार्थ्यांना वैविध्यपूर्ण आणि संबंधित कौशल्ये आत्मसात करण्यास प्रोत्साहित करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ लोकभवनात आयोजित केला जात आहे. याच लोकभवनातील दरबार हॉलमध्ये एचएसएनसी (HSNC) विद्यापीठातर्फे श्री रतन टाटा यांना ‘मानद डॉक्टर ऑफ लेटर्स’ (D.Litt.) पदवी प्रदान करण्यात आली होती. एखादे विद्यापीठ स्थापन करणे आणि ते जोपासणे यासाठी दूरदृष्टी, बांधिलकी आणि सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असते. १८ व्या शतकापर्यंत भारत व्यापार आणि व्यापारात जागतिक नेता होता, याचे मुख्य कारण आपली विविध कौशल्ये आणि कारागिरीची समृद्ध परंपरा होती. ते स्थान पुन्हा प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपल्याकडे असलेल्या मनुष्यबळाच्या कौशल्य विकासासाठी आणि पुनर्कौशल्यासाठी प्रयत्न दुप्पट करावे लागतील.

‘एआय लिविंग लॅब’ उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील समस्या सोडवण्याचे प्रशिक्षण- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केवळ तरुण लोकसंख्या असून चालत नाही, तर त्या लोकसंख्येला कौशल्याची जोड असेल तरच तो देशाचा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश (‘डेमोग्राफिक डिविडंड’) हा तयार होतो. तरुणांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे (उदा. AI, मॅन्युफॅक्चरिंग) प्रशिक्षण देणे आवश्यक असते. हीच बाब ओळखून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘स्किल इंडिया’ ची चळवळ सुरू केली आणि महाराष्ट्राने त्यात आघाडी घेतली आहे. “पूर्वी भांडवल महत्त्वाचे होते, पण आता गुंतवणूकदार तिथेच जातात जिथे कुशल ‘मानव संसाधन’ उपलब्ध आहे. कृत्रिम बुध्दीमत्ता हे आव्हान पेलण्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे गरजेचे आहे. काळानुरूप मानव संसाधन तयार करावे लागेल. उद्योगांच्या गरजेनुसार दिवसागणिक कौशल्य प्रशिक्षणात बदल करावे लागतील. आज रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ ‘एआय लिविंग लॅब’ सारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग जगातील समस्या सोडवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे, ही अभिनंदनीय बाब आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विद्यापीठाने मायक्रोसॉफ्टच्या मदतीने १०,००० महिलांना एआय (AI) ट्रेनिंग दिले आहे. “जॉब मार्केट वेगाने बदलत आहे. पारंपरिक विद्यापीठांच्या तुलनेत कौशल्य विद्यापीठांना अधिक लवचिक राहावे लागेल. आज भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकाकडे झेप घेत असताना, या गतीला टिकवून ठेवण्यासाठी केवळ पदवीधर नव्हे, तर ‘कौशल्य प्रशिक्षित’ तरुणांची गरज आहे. “देशात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एकट्या महाराष्ट्राचा वाटा ३१% आहे.महाराष्ट्र जर स्वतंत्र देश असता, तर ती जगातील ३० वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था ठरली असती. दावोस परिषदेत नुकतेच ३० लाख कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र युएई आणि सिंगापूरच्या अर्थव्यवस्थेलाही मागे टाकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र स्टार्ट अप्स आणि युनिकॉर्न मध्ये आघाडीवर असलेले राज्य आहे असेही ते म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि भावी आयुष्याच्या स्वप्नांचा सन्मान– उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, सुनेत्रा पवार म्हणाल्या की, रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचा हा दीक्षांत सोहळा ऐतिहासिक आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि भावी आयुष्याच्या स्वप्नांचा आज सन्मान होत आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. त्याअनुषंगाने केंद्रासोबतच राज्य सरकार ही कार्यरत आहे. मला सांगायला आनंद वाटतोय औंध येथील आयटीआय अतिशय अत्याधुनिक आणि रोजगाराभिमुख करण्यात आले आहे. कौशल्य विभागाच्या दक्ष आणि नुकतेच आकाराला आलेले महिमा योजनांमुळे राज्यभरात कौशल्य विकासाचे नवे पर्व सुरू झाले असून नवदिशा केंद्र राज्यातील ३६ ठिकाणी उभारण्यात येत कौशल्याचे अत्याधुनिक प्रशिक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्री महाफंड योजनेमुळे प्रतिभावान तरुणांच्या पंखांना नवे बळ मिळणार आहे. उद्योजक होण्यासाठी नवे द्वार उघडले जाणार आहे. नव्या तंत्रज्ञानानुसार विद्यार्थ्यांनी स्वतः ला बदलले पाहिजे. देशाच्या सर्वांगीण विकासाला आकार देणारे घटक म्हणून तरुणांकडे पाहिले जाते, त्यांनी नैतिकेच्या मूल्यांवर सामाजिक बांधिलकी ही जपली पाहिजे. आता पदवी घेऊन जागतिक स्पर्धेत उतरणाऱ्या सर्व पदवीधारकांचे अभिनंदन आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देते.

कौशल्य विकास हा आत्मनिर्भर भारताचा कणा – मंत्री मंगल प्रभात लोढा

मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सक्षम मनुष्यबळ तयार करण्याचे काम सुरू आहे. प्राचीन काळी भारताला ‘सोने की चिडिया’ म्हटले जायचे, त्यामागे केवळ कृषी नव्हे तर प्रत्येक घरातील कौशल्य ही मोठी ताकद होती. प्रत्येक कुटुंबातून सूक्ष्म उद्योग उभे राहत होते. हीच परंपरा पुन्हा जोपासण्याची गरज आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासन मजबूत असून, आता कौशल्य क्षेत्रात आणखी प्रगती करण्यावर भर दिला जात आहे. उपराष्ट्रपतींच्या हस्ते पहिला दीक्षांत समारंभ पार पडणे ही विद्यार्थ्यांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे. यामुळे त्यांच्या करिअरला अधिक बळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

स्वर्गीय रतन टाटा यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या या विद्यापीठातून केवळ तांत्रिक शिक्षणच नव्हे, तर मूल्यांचीही जपणूक होईल. स्वर्गीय जयंतराव सहस्त्रबुद्धे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या प्रदर्शन कक्षाचा उल्लेख करत, कौशल्य, नवोपक्रम आणि रोजगार निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सर्वोत्तम आयटीआय संस्थांचा गौरव करण्यात येत असून, आदिवासी, महिला आणि सर्वसाधारण गटातील प्रत्येकी एक उत्कृष्ट आयटीआयची निवड करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कौशल्यामुळेच तरुणांचे भविष्य उज्ज्वल होईल आणि महाराष्ट्र कौशल्य क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रस्थानी पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

२५,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी घेतल्या कौशल्य आधारित प्रमाणपत्रे व पदव्या- कुलगुरू डॉ.अपुर्वा पालकर

कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर या प्रास्ताविकात म्हणाल्या की, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत सोहळ्यात २५,००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपली प्रमाणपत्रे आणि पदव्या प्राप्त केल्या आहेत. हा विद्यापीठाच्या वाटचालीतील एक मैलाचा दगड असल्याचे डॉ.पालकर यांनी नमूद केले. विद्यापीठाने १०,००० महिलांना ‘AI’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) क्षेत्रात प्रशिक्षित करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गृह विभागाने विद्यापीठाला बिग डेटा एनालिटिक्स आणि ‘फेस रिकग्निशन सिस्टम’ विकसित करण्यासाठी १७ कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण प्रकल्प मिळाला आहे आहे. एम.टेक आणि बी.टेकचे विद्यार्थी प्राध्यापकांबरोबर यावर काम करत आहेत. विद्यापीठाने फ्रान्समधील रुबिका, अमेरिकेतील ईस्ट टेनेसी स्टेट युनिव्हर्सिटी आणि जर्मनीतील लाईपझिग युनिव्हर्सिटी यांसारख्या जागतिक संस्थांशी करार केले आहेत. जर्मन भाषेचे प्रशिक्षण देऊन ७०० विद्यार्थ्यांना परदेशात रोजगारक्षम करण्यात येत आहेत. विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटर च्या अंतर्गत २५ विद्यार्थ्यांना त्यांच्या स्टार्टअपसाठी प्रत्येकी २५,००० रुपये दर महा, एका वर्षासाठी ‘अमृत फंडिंग’ देण्यात आले आहे. तसेच राज्यातील १६० महाविद्यालयांमध्ये प्री-इन्क्युबेशन सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. रॅम्प (RAMP) प्रकल्पांतर्गत सुमारे १०,००० महिला, विद्यार्थी व युवक यांना लघू व मध्यम उद्योगासाठी रोजगारक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे, ज्याचा विस्तार राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांत झाला आहे असे त्यांनी सांगितले.

सहा सुवर्णपदक विजेते आणि औद्यागीक प्रशिक्षण संस्थाचा पार पडला सत्कार सोहळा

मुर्तजा आरिुहुसेन कादियानी यांनी क्लाउड कॉम्प्युटींग, अविनाश वसंत बोरसे यांनी सायबर सुरक्षा, अरवन अभय उपाध्याय यांनी डिजिटल मार्केटींग, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रविद्या मध्ये एन वैष्णवी, श्वेता पी, रेखा आशिष साळुंखे यांनी डिप्लोमा प्रयोगशाळा तंत्रविद्या यामध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. यावेळी ताराबाई मोडक महिलांचे औद्योगिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, लातूर, राजे विश्वेश्वरराव आत्राम, गडचिरोली, देवगिरी औद्योगिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजी नगर या औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचा सत्कार पार पडला. यावेळी ‘ड्रग्ज ला नाही म्हणा’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

स्व.जयंत सहस्रबुद्धे कौशल्याधारित प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभरात आयटीआयसाठी सहकार्य करणाऱ्या संस्थांच्या उपक्रमाचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले होते. या प्रदर्शनीचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. विभागाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप्स योजनेतील लाभार्थी युवतींच्या उपक्रमांचाही या प्रदर्शनात समावेश आहे. विद्यापीठाच्या उल्लेखनीय कौशल्य उपक्रमांसह उद्योगक्षेत्रात आघाडीच्या कंपन्यांचे मिळून एकूण बारा स्टॉल्स होते. टोयोटा किर्लोस्कर, अॅटलास, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, दासयू एव्हिएशन, प्रसिद्ध फिल्म निर्माते रॉनी स्क्रूवाला यांचे स्वदेश फॉऊंडेशन, अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टचाही यात समावेश होता.

About Editor

Check Also

एपस्टिन फाईल प्रकरणी काँग्रेस-‘वंचित’चा रा. स्व. संघाच्या नागपूरच्या मुख्यालयावर मोर्चा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात धडक मोर्चा

एपस्टिन फाईलमध्ये आलेला नरेंद्र मोदींच्या नावाचा उल्लेख व अमेरिकेशी तडजोड करणारे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *