महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या १६ व्या हप्त्याचे वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथील जाहिर कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचा २ रा आणि ३ रा निधीचे वाटपही करण्यात येणार आहे. परंतु यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी १० वर्षापूर्वी दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण केले नसल्याबाबत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून काही मागणी करतील म्हणून स्थानिक पोलिसांकडून चक्क ग्रामीण नागरिकांना बॅनर लावण्यास मनाई करण्यात आली असून जर असा बॅनर लावल्यास किंवा त्याबाबतचे वक्तव्य किंवा समाजमाध्यमातून त्याविषयीचे भाष्य केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी गावकऱ्यांना दिला.
आर्णी तालुक्यातील गावकऱ्यांना स्थानिक पोलिसांनी बजावलेल्या नोटीसीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी थेट भाजपा आणि पंतप्रधानांवर निशाणा साधत आहे. यासंदर्भात एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांनी गावकऱ्यांना बजावलेल्या नोटीशीचे पत्रच ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केला.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी साहेब, तुम्ही दिलेली आश्वासने पूर्ण झाली एवढेच दाभाडीतील गावकरी सांगत आहेत. तुम्ही दिलेल्या गॅरंटीला दहा वर्षे झाली तरी ती पूर्ण झालेली नाही याची आठवण करून देण्यात गैर काय? असा सवाल करत एका बॅनरची एवढी कसली भीती? त्यांना कशाला नोटीसा पाठवता ? साधी गावकरी लोकं आहेत ती असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारला टोला लगावला आहे.
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, खोटी गॅरंटी द्या, जनतेने, विरोधी पक्षातील नेत्यांनी आणि स्वतःच्या पक्षातील नेत्यांनी हिशोब मागितला की मुस्कटदाबी करा-फौजदारी कारवाईचा धाक दाखवा हे बरं नाही असा सूचक इशाराही भाजपाला दिला.
पंतप्रधान मोदी साहेब, तुम्ही दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाही एवढेच दाभडीतील गावकरी सांगत आहेत. तुम्ही दिलेल्या गॅरंटीला दहा वर्षे झाली तरी ती पूर्ण झालेली नाही याची आठवण करून देण्यात गैर काय? एका बॅनरची एवढी कसली भीती?
त्यांना कशाला नोटिसा पाठवता ?
साधी गावकरी लोकं आहे ती.… pic.twitter.com/paFSRmnyAn— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 28, 2024
Marathi e-Batmya