अजित पवार यांचा सवाल, शिवसेना – वंचित युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे? उध्दव ठाकरे यांच्या भेटीनंतर भूमिका मांडू...

शिवसेना – वंचित यांच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे? का गैरसमज पसरवत आहात असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना केला.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालय पार पडल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर वंचितने युती केली हे माध्यमातून समजले आहे. उध्दव ठाकरे यांची आज मी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भेट घेणार आहोत. त्यावेळी यावर स्पष्टपणे चर्चा करु व त्यानंतर आमची भूमिका मांडू असे स्पष्ट करतानाच उध्दव ठाकरे यांनी कुणाला मित्रपक्ष म्हणून घ्यायचं व त्यांच्या कोट्यातून घ्यायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे असल्याचे स्पष्ट केले.

तसेच यावेळी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, राजकारणात मागच्या निवडणुकीत कुणी जागा पाडल्या याला काही अर्थ नसतो. राजकारणात येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आराखडे आखावे लागतात व राजकीय भूमिका मांडावी लागते. युती – आघाडी होते. त्यावेळी ‘मागचं झालं गेलं गंगेला मिळालं’ असं करुन पुढे गेलो तरच योग्य गोष्टी घडतात असे म्हणाले.

मुळात मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची ताकद आहे हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे याअगोदरच उध्दव ठाकरे यांच्यासोबत आम्हाला बरोबर घ्या अशी सकारात्मक चर्चा झाली होती. तसेच त्यांचा पक्ष हा मोठा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जाऊन आगामी निवडणूकीच्या अनुंषगाने चर्चा करणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली.

चिंचवड आणि कसबा या दोन्ही जागांसंदर्भात पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली. आघाडी म्हणून शिवसेना, काँग्रेससोबत चर्चा करतोय. याशिवाय जे घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन या निवडणूका लढवल्या जाव्यात ही भूमिका असून याबाबत अंतिम निर्णय झाल्यावर माध्यमांना सांगितला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

एखाद्याची महत्त्वाची नेमणूक ज्यांनी केली आहे, त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करायची असते त्यातूनच राज्यपालांनी ती इच्छा व्यक्त केली असावी असे मतही अजित पवार यांनी व्यक्त केले.

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये संघटना वाढ, विधान परिषदेच्या निवडणूका, चिंचवड व कसबा पोटनिवडणूक आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काय नीती असावी याबाबत चर्चा झाल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली.

About Editor

Check Also

एस. चोकलिंगम यांची माहिती, मतदार याद्या होणार अधिक पारदर्शक १ लाख २५३ बुथ परिसरातील मतदारांचे राज्यभर विशेष सखोल पुनरिक्षण

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येणार असून राज्यातील सुमारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *