महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९व्या वर्धापन दिनी उद्या २० मार्च रोजी चवदार तळे क्रांतीदिनाला अभिवादन करणा-या जाहीर सभेचे आयोजन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने चवदार तळे येथील क्रांती स्तंभाजवळ करण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात भारतीय दलित पँथरच्या काळापासुन दरवर्षी २० मार्च रोजी चवदार तळे क्रांतीला अभिवादन करणा-या सभेचे आयोजन केले जात आहे. यंदाही २० मार्च रोजी सायंकाळी महाड क्रांतीभूमी क्रांती स्तंभाजवळ चवदार तळे क्रांतीला अभिवादन करणा-या सभेचे आयोजन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आले असून त्या सभेस केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिली.
चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्याचा सत्याग्रह नव्हता तर मानव मुक्तीचा समतेचा संगर होता. मानवीहक्काच्या आणि समतेच्या लढयात जागतिक स्तरावर चवदार तळे सत्याग्रह प्रेरणादायी क्रांती ठरलेला आहे. चवदार तळे सत्याग्रह करुन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेच्या आणि मानवतेच्या चळवळीचा पाया रचला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळे येथे उभारलेल्या मानव मुक्तीच्या संगरामुळे आम्हाला प्रेरणा मिळते. चवदारतळयाकाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या मानव मुक्तीच्या संगरातुनच या देशात सामाजिक न्यायाचा उगम झालेला आहे. त्यामुळे जगभरातील समतावाद्यांसाठी चवदार तळयाची क्रांती ही प्रेरणास्थान आहे.असे सांगत रामदास आठवले यांनी चवदार तळे सत्याग्रहाच्या ९९व्या वर्धादिनाच्या क्रांतीदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सलग तीनवेळा राज्यसभेत बिनविरोध निवड झाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा भव्य सत्कार कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश धो.मोरे यांनी दिली . त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
Marathi e-Batmya