नवी दिल्ली-मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील किमान सामायिक कार्यक्रमावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत. यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोमवारी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी नवी दिल्ली येथे जाणार असून त्यानंतर १९ ते २५ नोव्हेंबरच्या दरम्यान केव्हाही नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता असल्याची माहिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
१७- १८ नोव्हेंबर रोजी शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातील भेटीची वेळ निश्चित झाली आहे. या दोन नेत्यांमधील बैठकीनंतर काँग्रेस पक्षाध्यक्षा गांधी या पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी मंगळवारी आणि बुधवारी बैठक घेणार असून त्यात शिवसेनेबरोबरील सरकार स्थापनेवर आणि निश्चित करण्यात आलेल्या किमान समायिक कार्यक्रमावर अंतिम चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेसमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
या दोन दिवसाच्या बैठकीनंतर काँग्रेसकडून शिवसेना सरकारला पाठिबा देत त्यात सहभागी होणार असल्याची राष्ट्रवादीसोबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण मानसिकता तयार आहे. आता अंतिम बोलणीवर पवार, गांधी आणि ठाकरे यांच्याकडून शिक्कमोर्तब झाल्यानंतर १९ ते २३ नोव्हेंबर पर्यंत अधिकृत घोषणा करण्यात येईल त्यानंतर केव्हाही नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
Marathi e-Batmya