युक्रेन-रशिया युध्दाच्या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले,… यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना त्रास पुण्यातील कार्यक्रमाबरोबरच युक्रेनमधील विद्यार्थ्यांची सोडवणूकही महत्त्वाची - शरद पवार

पुण्यात अनेक महत्त्वाचे प्रकल्प येत असून उदघाटनाचे कार्यक्रमही होत आहेत. या महत्त्वाच्या कार्यक्रमासोबतच युक्रेनमधील मुलांची सोडवणूक करणेही अधिक महत्त्वाचे आहे, असे सांगतानाच देशाची सुत्रे ज्यांच्याकडे आहेत, ते याची गांभीर्याने दखल घेतात का? हा महत्वाचा सवाल आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुणे येथे पत्रकारांशी बोलताना मांडले.

आज रशिया व युक्रेन युध्दाच्या संकटात कुणी काय केले किंवा काय केले नाही. याची चर्चा करण्याची ही वेळ नाही. या मुलांना संकटातून कसे वाचवता येईल याकडे सत्ताधारी घटकांनी यात अधिक लक्ष द्यायला हवं असेही ते म्हणाले.

युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना पुन्हा देशात आणण्यासाठी भारत सरकार आणि दुतावासाने काही प्रयत्न केले आहेत. पण काल माझ्याशी रशियाच्या सीमेपासून पाच तासांवर असलेल्या विद्यार्थ्यांनी फोनवरुन संवाद साधला, त्यानंतर परराष्ट्र मंत्र्यांशीही माझे बोलणे झाल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकार या मुलांना परत आणण्यासाठी जे जे करता येईल, ते करण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही अजून विद्यार्थी तेथे आहेत. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर युक्रेनच्या सीमेबाहेर येता येईल असा प्रयत्न करा असे भारतीय दुतावासाकडून त्यांना सांगितले जात आहे. मात्र मुलांचे म्हणणे आहे की, युक्रेनच्या सीमेवर जाण्यासाठी पाच ते सहा तास चालावं लागेल. त्यात भयंकर थंडी आहे, तर दुसरे म्हणजे तिथे हल्ले होत आहेत, गोळीबार होत आहे. त्यामुळे विद्यार्थी अकडले असल्याचे त्यांनी सांगितले.

लिबियातून हजारो माणसे याआधी भारताने आणली होती. सामान्य माणसांना याची कल्पना देखील नाही. युक्रेन आणि रशियाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परत आणण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. टीका-टीपण्णी आज करण्याची आवश्यकता नाही असेही सांगत ते पुढे म्हणाले की, युक्रेन-रशिया संघर्षाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवरही दुष्परिणाम होऊ शकतो. देशाचे कृषी खाते सांभाळल्याने खाद्यतेलाची आपली स्थिती माहीत आहे. सुर्यफुल हे महत्त्वाचे खाद्य तेलाचे पिक असून युक्रेनमध्ये सर्वात जास्त सुर्यफुलाची शेती होते. त्यामुळे सुर्यफूल तेलाची कमतरता भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन अधिक लक्ष द्यावे, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.

केंद्र सरकारने रशिया किंवा युक्रेनची बाजू न घेता तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. यात काही नवीन नाही. नेहरूंच्या काळातदेखील आपले हेच धोरण राहिले आहे. या धोरणावर टीका-टिप्पणी करण्याची गरज नाही. असे म्हणतात की, पुतिनशी बोलल्यानंतर रशियाने एक पॅसेज खुला केला आणि विद्यार्थ्यांना जायला मार्ग मिळाला. पण विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर ते सांगतात की, त्या पॅसेजमधून जाताना रशियाची फायरिंग सुरु आहे. तसेच दुसरी अडचण अशी की, युनोमध्ये भारताने घेतलेल्या भूमिकेमुळे युक्रेनचे नागरीक भारतीय मुलांवर नाराज आहेत. युक्रेनचे स्थानिक नागरिक भारताच्या भूमिकेचे खापर विद्यार्थ्यांवर फोडत आहेत. त्यामुळे मुलांना यातना सहन कराव्या लागत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

About Editor

Check Also

इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यात आतापर्यंत इराणच्या ७८० हून अधिक जणांचा मृत्यू अमेरिका, इस्रायलकडून हिजबुल्लाह आणि इराणवर हल्ले सातत्याने सुरुच

पश्चिम आशियातील युद्ध तीव्र होत असताना, अमेरिका आणि इस्रायलने २७ फेब्रुवारी २०२६ रोजी हल्ले सुरू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *