“या” जिल्ह्यांना पुढील ४ ते ५ दिवस रेड आणि यलो अलर्ट मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश

मागील दोन आठवड्यापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनने चांगलीच हजेरी लावत सातत्याने पाऊस कोसळत आहे. परंतु मागील दोन दिवस पावसाने उघडीप दिली असे वाटत असतानाच आगामी ४ ते ५ दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने आज दिला. हवामान खात्याचे वरिष्ठ अधिकारी के.एस.होसळीकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

दोन आठवड्यात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसानं हजेरी लावल्याने मुंबईसह उपनगरे, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात नागरिकांची प्रचंड धांदल उडाली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भ आणि गडचिरोली याठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. तर काही गावांचा संपर्क तुटला.

त्यानंतर आता महाराष्ट्रात पावसानं काहीशी उसंत घेतली आहे. पण पुढील तीन दिवसात राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे. आगामी ४ ते ५ दिवसांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याच्या शक्यता असून पुढील तीन दिवसांत अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार असल्याचं होसाळीकर यांनी सांगितले.

आज गोंदिया आणि वाशिम जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली या २२ जिल्ह्यांना हवामान खात्याने पिवळा इशारा (येलो अलर्ट) जारी केला आहे. येत्या काही तासांत संबंधित जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

पुढील दोन दिवस महाराष्ट्रात कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे. सोमवारी १८ जुलै रोजी गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि उस्मानाबाद हे चार जिल्हे वगळता उर्वरित महाराष्ट्रात सोमवारी पिवळा इशारा देण्यात आला.

About Editor

Check Also

मुंबई क्लायमेट वीक : हवामान कृतीसाठी भारताचे अवकाशवीर एकाच मंचावर राकेश शर्मा–शुभांशु शुक्ला यांची उपस्थिती; सचिन तेंडुलकर करणार गौरव

भारताच्या पहिल्या मुंबई क्लायमेट वीकमध्ये हवामान कृतीच्या लढ्यात देशाचे दोन अवकाशवीर राकेश शर्मा आणि शुभांशू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *