नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू केल्याने काही प्रमाणात आपण या विषाणूला रोखू शकलो. आता आपण अनलॉक-२ मध्ये प्रवेश केला आहे. तसेच ही परिस्थिती आणखी काही काळ अशीच राहणार असल्याने येत्या नोव्हेंबर पर्यत देशातील ८० कोटी गरीब, गरजू, कामगार असलेल्या नागरिकांना महिन्याला प्रति व्यक्ती मोफत ५ किलो तांदूळ किंवा गहू आणि डाळ देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
या पाच महिन्याच्या कालावधीत ९० हजार कोटींचा खर्च होणार आहे. यात मागील तीन महिन्याचा खर्च जोडल्यास १.७५ लाख कोटी रूपयांचा खर्च होणार आहे. देशात एक देश एक रेशन कार्ड ही योजना लागू करण्यात येत आहे. या योजनेचा फायदा स्थलांतरीत कामगारांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. ही योजना खरे श्रेय फक्त दोन वर्गांना जात असून त्यापैकी एक म्हणजे शेतकरी आणि दुसरा म्हणजे प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या लोकांना जात असल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील प्रत्येकाला सशक्त बनविण्यासाठी, आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी कामे यापुढेही करत राहू असे सांगत त्यासाठी देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी आपण सतत काम करू आणि पुढेही जावू असे आश्वास्त त्यांनी केले.
तसेच आतापर्यत जशी तुम्ही काळजी घेतलात तशीच यापुढेही घ्यायची असून चेहऱ्यावर मास्क, गमजा आदी वापरा, हात धुणे-सॅनिटायझ करणे आदी गोष्टी करा असे आवाहनही त्यांनी यावेळी जनतेला केले.
Marathi e-Batmya