मराठी ई-बातम्या टीम
केंद्र सरकारचा निर्णय चुकीचा आहे असं होऊ शकते. पण भावना मात्र चुकीची नव्हती अशी कबुली दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देत आमच्यावरील टीकाकारही गेल्या सात वर्षात देशात खूप मोठे बदल पहायला मिळाल्याचं मान्य करतात. सरकारवर भ्रष्टाचाराचा कोणताही आरोप लागलेला नाही. सर्वांशी सल्लामसलत केल्यानंतरच सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यात आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या (FICCI) ९४ व्या वार्षिक संमेलनात ते बोलत होते.
देशातील १३० कोटी लोकांचा लोकशाहीवरील विश्वास अजून वाढला आहे. हेच मोदी सरकारचे सर्वात मोठं यश असून देशाच्या विकासात फिक्कीचं योगदान कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
करोना संकटादरम्यान सरकारने असे अनेक निर्णय घेतले ज्याचा फायदा पुढील बऱ्याच काळापर्यंत होईल. अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असून देशाचा आर्थिक दर दुहेरी अंकी झाल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दीड वर्षाहून अधिक काळ ८० कोटी लोकांना प्रती व्यक्ती /दर महिना मोफर अन्न देण्याचं काम भाजपाच्या मोदी सरकारने केले आहे. हे खूप मोठं काम असून, जगात कोणीही असं केलेलं नाही. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने आपल्या मार्गावर येत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
FICCI चं कौतुक करताना ते म्हणाले की, १९७२ पासून आजपर्यंत देशाच्या विकासात फिक्कीचं योगदान आहे. आता ते योगदान अनेक टक्क्यांनी वाढवण्यासाठी आपण सर्वांनी पुढे यावे आणि इतर क्षेत्रांचाही विचार करावा ही वेळ आली आहे. फिक्कीसारख्या संघटना पुढे आल्या तरच आत्मनिर्भर भारताचं ध्येय पूर्ण होऊ शकतं.
Marathi e-Batmya