मुंबई : प्रतिनिधी
देशातील विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतरही गोष्टींचे ज्ञान आणि माहिती व्हावी या उद्देशाने सध्याच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहे. हा बदलेला अभ्यासक्रम कसा असावा आणि त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असावा या उद्देशाने केद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एनसीईआरटी) अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने थेट जनतेला सूचना करण्याचे आवाहन केले आहे.
मागील काही वर्षापासून देशातील शालेय विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमाद्वारे माहिती व ज्ञान मिळावे यासाठी अनेक विषय वाढविण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तरांचे ओझे वाढत गेले. मात्र विद्यार्थ्यांवर दप्तराचे ओझे वाढण्याबरोबरच त्यांच्यात मानसिक तणावही वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगळ्याच मानसिक आरोग्याला सामोरे जावे लागत आहे. या घटनेची दखल घेत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने शालेय अभ्यासक्रमात बदल आणि सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार या नव्या अभ्यासक्रमात विद्यार्थी हा सर्वबाजूने निष्णांत व्हावा यादृष्टीने अभ्यासक्रमात क्रिडा-खेळांचा समावेश करण्याचा विचार सुरु आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाच्या अनुषंगाने त्याला शिक्षण मिळाले पाहिजे अशा आशयाचा अभ्यासक्रम तयार करण्याचा विचार युध्द पातळीवर सुरु आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा यासाठी देशातील सुज्ञ नागरीकांनी सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एनसीईआरटीकडून देशातील नागरीकांकडून ३० एप्रिल २०१८ अखेर पर्यंत http://mhrd.gov.in/suggestions/या संकेतस्थळावर ऑनलाईन सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.