डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम २०२० पर्यंत पूर्ण करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेवर भेट देऊन पाहणी केली. इंदू मिल येथे जगाला आवडेल असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार असून १४ एप्रिल २०२० पर्यंत ते पूर्ण करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत २०१९ पर्यंत स्मारकाचे काम दृष्य स्वरुपात दिसेल असे आश्वासनही दिले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भाई गिरकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यु.पी.एस. मदान, स्मारकाचे वास्तू विशारद शशी प्रभू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समितीचे सचिव नागसेन कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक स्तरावरचे भव्यदिव्य असे स्मारक या ठिकाणी उभारण्यात येणार आहे.  मुंबईत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला  स्मारकाच्या उंचीमुळे या  भव्य स्मारकांचे  वांद्रे वरळी सी लींकवरून देखील दर्शन घेता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठीच्या सर्व परवानग्या  मिळविण्यात आल्या आहेत. स्मारकाच्या काम कालबध्द पध्दतीने होण्याबाबतचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्मारकाच्या जागेची तसेच प्रतिकृतीची पाहणी केली. यावेळी स्मारकाच्या कामाचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांना करण्यात आले.

About Editor

Check Also

जयकुमार रावल यांची माहिती, उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील स्वदेशी उद्योगाबरोबर विदेशी गुंतवणुकीच्या उद्योगांना गॅसचा पुरवठा

महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी काळजी घेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *