आदित्य ठाकरे यांचा सवाल, पार्टी विध डिफरन्स म्हणवणारे मिंधे आणि चिंधी सोबत कसे ?

मुंबई महापालिकेत गेल्या वर्षभरात खोके सरकारचा जो भ्रष्टाचार सुरु आहे त्याविरोधात आपण वेळोवेळी आम्ही आवाज उठवला आहे. रस्त्यांचा घोटाळा, खडीचा घोटाळा, सॅनेटरी पॅड व्हेंडिंग मशीनचा घोटाळा असे अनेक घोटाळे मुंबई महापालिकेत होत आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून ते होत असतील. असे खूप घोटाळे राज्यभरात होत आहेत. मुंबईतले जे घोटाळे समोर आले आहेत त्याविरोधात आम्ही १ जुलैला मोर्चा काढणार असल्याचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

१ जुलै रोजी मुंबई महापालिकेवर शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या अनुषंगाने युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवनात शिवसैनिकांची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते होते.
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईचा पैसा दिल्लीश्वरांच्या सांगण्यावरुन लुटला जातो आहे. कुठे जातो आहे कुणालाच माहित नाही किंवा सगळ्यांना ठाऊक असेल. पण हे सगळं करताना आम्ही संपूर्ण मुंबईला १ जुलैच्या मोर्चासाठी सहभागी करण्याचं आवाहन करतो आहोत. मुंबईतले ५० रस्ते पूर्ण झालेले नाही. मुंबईत घाणेरडे लाईट्स लावले आहेत. यातले घोटाळे आम्ही बाहेर काढणार आहोत. भाजपाच्या काही आमदारांनीही या घोटाळ्यांविरोधात आवाज उठवला होता असेही आवर्जून सांगितले.

कोविड सेंटर वाटपप्रकरणी ईडीने सूरज चव्हाण यांच्या घरावर धाड टाकल्यानंतर आदित्य ठाकरे हे सूरज चव्हाण यांना भेटण्यासाठी घरी होते. त्याबाबत विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, सूरज चव्हाणच्या घरी मी गेलो होतो. मात्र जे खरे शिवसैनिक आहेत ते असल्या कारवायांना ते घाबरत नाहीत. त्यांच्या परिवाराने आम्हाला सांगितलं की घाबरायचं नाही. आम्ही त्यामुळे आता पुढे चाललो आहोत. ज्या मंत्र्यांची हकालपट्टी व्हायला हवी ती होत नाही. कर्नाटकात आपण ४० टक्के सरकार समजत होतो. पण इथे १०० टक्के खोके सरकार झालं आहे अशीही टीका केली.

यावेळी शिंदे गटावर आणि भाजपावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, भाजपा स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणत होती. मग तीच भाजपा या मिंधे आणि चिंधी सरकारबरोबर कशी? देशात हे आता पार्टी विथ डिफरन्स आहोत हे या भ्रष्ट लोकांसह बसून कसं सांगणार? असा सवालही केला.

मागच्या वर्षभरात आयएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या या पैसे घेऊन केल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे अधिकारी पैसे मागत आहेत. कृषी क्षेत्र कोलमडलं आहे, वेदांता फॉक्सकॉन राज्यातून शेजारील गुजरातमध्ये गेलं अशी भयंकर परिस्थिती कधीही महाराष्ट्रात आली नव्हती असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

ठाकरे कुटुंबाची सुरक्षा कमी केली या बातमीचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इन्कार केला आहे. मात्र तुम्ही मातोश्रीच्या बाहेर येऊन पाहिलंत तर तुम्हाला वस्तुस्थिती कळेल. तो ठाकरे कुटुंबाचा विषय असल्याने मी त्यावर बोललो नाही. मात्र इतकंच सांगेन की आमचं सुरक्षा कवच हे बाळासाहेब ठाकरे आणि भारतातली जनता आहे. आम्ही भ्रष्टाचाराच्या आणि खोके वृत्तीच्या विरोधात लढत आहोत, आम्ही लढत राहणार असा इशाराही दिला.

राजकीय हेतूने आणि चिंधी मनाने कारवाया होत आहेत. याची दखल संपूर्ण देशच नाही तर ३३ देश घेत आहेत. जी गद्दारी त्यांनी केली जी त्या गद्दारीची दखलही ३३ देशांनी घेतली आहे. मुंबई महापालिका ही हुकूमशाही राजवटीत चालवली जाते आहे. याच मुंबई महापालिकेने जे गद्दार, घटनाबाह्य मुख्यमंत्री सांगतात की बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत, त्यांच्याच फोटोवर हातोडा मारला आणि बुलडोझर चालवला आहे. हे शिवसैनिक आणि महाराष्ट्र सहन करणार आहेत का? हे सगळं सच्चा शिवसैनिक लक्षात ठेवणार आहे असंही आदित्य ठाकरेंनी सांगितले.

About Editor

Check Also

माधुरी मिसाळ यांची माहिती, १० हजार बसची आवश्यकता बेस्ट बससेवेबाबत मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेणार

मुंबईतील बेस्ट बससेवाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबईतील सर्व स्थानिक आमदार यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *