हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला कॉमेडियन स्टार म्हणून त्यांच्या नावाची नोंद आहे. लहानपणापासून त्यांनी कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मुंबईमध्ये एक छत्री बनवण्याच्या दुकानात त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत होते. पण, कामापेक्षा त्यांना सिनेमावर अधिक लक्ष केंद्रित करत होते. एके दिवशी ते थेट बॉम्बेच्या प्रसिद्ध इंपिरियल फिल्म कंपनीमध्ये काम मागण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांना काय करतो असे विचारण्यात आले. काम न मिळण्याच्या भीतीने त्यांनी एक खोटेपणाची यादी सांगितली. ‘मी गाऊ शकतो, घोडेस्वारी करू शकतो, मारामारी करू शकतो, तुम्ही जे सांगाल ते करू शकतो. असे उत्तर त्यांनी दिले. याच खोटेपणामुळे त्यांना चित्रपटसृष्टीत काम मिळाले आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी भारताचा पहिला कॉमेडी किंग ही बिरुदावली मिळवली. प्रसिद्ध कॉमेडीयन जॉनी वॉकर आणि मेहमूद हे देखील त्या अभिनेत्याचे चाहते होते. हा अभिनेता होता नूर मोहम्मद चार्ली.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील पोरबंदर येथील राणावाव गावातील मेनन कुटुंबात १ जुलै १९११ रोजी नूर मोहम्मद यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांचा कल रंगभूमीकडे होता. शाळा सोडून गावी येणारी नाटक कंपनीची नाटके बघायला ते जात. त्यामुळे अभ्यासात मागे पडू लागले आणि वाढत्या वयाबरोबर अभ्यासातून पूर्णपणे लक्ष बाहेर गेले. दरम्यान, कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. त्यावेळी त्यांनी कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. कामाच्या शोधत ते मुंबईला आले. एक छत्री बनवण्याच्या दुकानात ते काम करू लागले. त्यामधून त्यांना चांगले उत्पन्न इलत होते. परंतु, त्यांचे लक्ष सिनेमामध्ये काम मिळण्यावर अधिक होते.
चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणारा तो काळ होता. छोट्या कामांसाठीही लोकांचे मन वळवावे लागत असे. अशातच १९२५ च्या दरम्यान ते त्यांनी प्रसिद्ध इंपिरियल फिल्म कंपनी गाठली. येथे त्यांनी आपल्या कौशल्याची खोटी यादी दिली आणि काम मिळविले. १४ वर्षांच्या नूर मोहम्मदचा चित्रपट प्रवास सुरू झाला. इंपिरियलमध्ये काही काळ काम केल्यानंतर त्यांना कृष्णा फिल्म कंपनीच्या ‘अकलना बर्दन’ चित्रपटात छोटी भूमिका मिळाली. प्रफुल्ल घोष दिग्दर्शित नूर मोहम्मद यांचा हा पहिला चित्रपट होता.
‘अकलना बर्दन’ यानंतर त्यांना जरीना, प्रेमी पागल, चंद्रहास असे चित्रपट मिळले. चंद्रहास हा चित्रपट गंभीर होता. पण, नूर मोहम्मद यांनी काही विनोदी दृश्ये देऊन लोकांची वाहवा मिळविली. त्यांना कॉमेडी चित्रपटांचे वेड होते. मूकपटांच्या काळात चार्ली चॅप्लिन हे एकमेव विनोदी कलाकार होते. चार्ली हे त्यांचे आदर्श होते. त्यामुळे आपल्या चित्रपटांमध्ये ते त्यांचे अनुकरण करत. ते स्वत:ला चार्लीप्रमाणे सादर करत. ३० च्या दशकात चित्रपट निर्मात्यांनी याचा फायदा घेत नूर मोहम्मद यांची पात्रे त्याच पद्धतीने लिहिली. एल्फीन फिल्म कंपनीने नूर मोहम्मद यांना घेऊन भारतीय चार्ली चॅप्लिन हा चित्रपट बनवला. १९३३ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट हिट झाला आणि या चित्रपटाने त्यांना स्टारडम मिळाले. देशभर त्यांच्या कामाची प्रशंसा झाली. यानंतर त्यांनी आपले नाव नूर मोहम्मद असे बदलून नूर मोहम्मद चार्ली असे केले. हिटलर कट मिशा ठेवून त्याने आपला लूक पूर्ण बदलला. चित्रपट हिट करण्यासाठी ज्यावेळी मेलोड्रामा आणि गाणी ही एकमेव यंत्रे होती. त्याचवेळी नूर मोहम्मद यांनी विनोदाची ओळख करून देत मनोरंजनाची व्याख्या बदलली.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या दशकात नूर मोहम्मद यांना त्याकाळातील बडे स्टार मानले जाणारे पृथ्वीराज कपूर यांच्यापेक्षाही जास्त मानधन मिळत होते. प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी वॉकर आणि मेहमूद हे देखील नूर मोहम्मद चार्लीचे प्रशंसक होते. ते ही त्यांची नक्कल करत. चित्रपटसृष्टीमध्ये त्या काळात फिल्म स्टुडिओ प्रत्येक कलाकाराशी करार करत असत. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर कलाकारांना मासिक पगार देत असत. करार काळात कलाकार यांना इतर कोणत्याही स्टुडिओच्या चित्रपटावर स्वाक्षरी करण्यास मनाई होती. पण, नूर मोहम्मद चार्ली यांनी ही संस्कृती संपवली. त्यांच्या टॅलेंटमुळे प्रत्येक नवीन स्टुडिओला नूर मोहम्मद यांना साइन करायचे होते. अशावेळी ते फक्त चित्रपटाची फी घेत असत. त्यामुळे त्यांनी स्वतःला कोणत्याही स्टुडिओचे बंधन घालून घेतले नाही. नूर मोहम्मद यांचे स्टारडम इतके होते की स्टुडिओ मालक त्याच्या सर्व अटी मान्य करत असत.
विनोदी अभिनेता म्हणून ठसा उमटवल्यानंतर नूर मोहम्मद यांनी लेखन आणि दिग्दर्शनातही हात आजमावला. १९४१ चा धंधोरा चित्रपट नूर मोहम्मद यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला. या चित्रपटात तो हसन बानोसोबत मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटातील ‘पलट तेरा ध्यान कहा है’ हे गाणे खूप गाजले होते. १९४७ मध्ये भारत पाकिस्तान फाळणी झाली. नूर मोहम्मद तेव्हा त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होते. खुर्शीद बानो, नूरजहाँ, निसार बझमी आणि बहुतेक मुस्लिम कलाकार भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक होत होते. त्यांच्यासोबत नूर मोहम्मद यांनीही पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतला आणि तीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली.
पाकिस्तानी चित्रपटसृष्टीत सतत फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर नूर मोहम्मद चार्ली १९६० मध्ये पुन्हा भारतात परतले. जमीन के तारे आणि जमाना बदल रहा या चित्रपटात काम केले. भारतात राहून पुन्हा भारतीय सिनेमात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. पण, भारत आणि पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारत सरकारने त्यांना नागरिकत्व देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना पाकिस्तानात परतावे लागले. काही काळ त्यांनी पाकिस्तानी चित्रपटांमध्ये काम केले. पण, त्यानंतर त्यांनी आपला मुक्काम अमेरिकेत राहणाऱ्या मुलाकडे हलविला. अमेरिकेत काही वर्षे घालवल्यानंतर नूर मोहम्मद पत्नीच्या मृत्यूनंतर पाकिस्तानात परतले. ३० जून १९८३0 रोजी त्यांचे निधन झाले. दुर्दैवाने, या प्रसिद्ध कॉमेडी किंगच्या अंत्यसंस्काराला एकही मोठा पाकिस्तानी सेलिब्रिटी उपस्थित नव्हता. नूर मोहम्मद यांची दोन मुले लतीफ चार्ली आणि नूरश हे पाकिस्तानी चित्रपट उद्योगातील अभिनेते आहेत. त्यांचा नातू यावर चार्ली हा देखील अनेक टीव्ही शोमध्ये सहभागी झाला आहे. नूर मोहम्मद यांची तिसरी पिढी चित्रपट क्षेत्रात आहे आणि ती ही नूर मोहम्मद यांच्याप्रमाणेच चार्ली हेच आडनाव वापरते हे विशेष…