मणिपूरमध्ये हिंसाचाराची नवीन लाट उसळली असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हल्ले आणि हत्येचे सत्र सुरु झाल्याची माहिती पुढे येत आहे. मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात आज सकाळी काही संशयित कुकी बंडखोरांनी राज्याची राजधानी इंफाळपासून सुमारे २३० किमी अंतरावर असलेल्या नुंगचप्पी गावावर हल्ला केल्यानंतर झालेल्या ताज्या हिंसाचारात किमान पाच जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जिरीबाममध्ये दोन लढाऊ समुदायांच्या लोकांमध्ये झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा झोपेत गोळ्या झाडून मृत्यू झाला तर इतर चार जण ठार झाले. अतिरेकी एका निर्जन ठिकाणी एकट्या राहणाऱ्या व्यक्तीच्या घरात घुसले आणि नंतर झालेल्या जोरदार गोळीबारात तीन टेकडींवर असलेल्या अतिरेक्यांसह चार सशस्त्र लोक ठार झाले.
आदल्या दिवशी काकचिंग जिल्ह्यातही हिंसाचाराची नोंद झाली होती, जिथे गोळीबार आणि बॉम्बस्फोट झाले होते. शुक्रवारीही रॉकेट हल्ल्यात बिष्णुपूर जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले. पहिला रॉकेट हल्ला बिष्णुपूर जिल्ह्यातील ट्रोंगलाओबी येथे पहाटे ४.३० च्या सुमारास झाला, ज्यामुळे दोन इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दुसरे “अनगाइडेड” रॉकेट क्षेपणास्त्र माजी मुख्यमंत्री मायरेम्बम कोइरेंग यांच्या गजबजलेल्या मोइरांग शहरातील मैरेम्बम लेकाई येथील निवासस्थानाच्या कंपाऊंडवर पडले, त्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला आणि १३ वर्षांच्या मुलीसह पाच जण जखमी झाले.
बिष्णुपूर जिल्ह्यातही एका वेगळ्या बॉम्ब हल्ल्यात अनेक जण जखमी झाले. अलीकडील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, मणिपूर पोलिसांनी या प्रदेशात ड्रोनविरोधी यंत्रणा तैनात केल्या आहेत. तसेच अँटी-ड्रोन गन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
मणिपूरमधील लगतच्या डोंगररांगांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन करण्यासाठी अनेक पोलिस पथके आणि अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. हवाई गस्त घालण्यासाठी लष्करी हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी रात्री अनेक ड्रोन दिसल्यानंतर बिष्णुपूर आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील परिघीय भागातील लोकांनी त्यांचे दिवे बंद केले.
अधिका-यांनी सांगितले की, बिष्णुपूर जिल्ह्यातील नारायणसेना, नंबोल कामोंग आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील पुखाओ, डोलायथाबी, शांतीपूर येथे अनेक ड्रोन दिसले, ज्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली.
दरम्यान मणिपूरमधील पुन्हा उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी तातडीने बैठक बोलावली असल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांकडून देण्यात येत आहे.