उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव शिवसेना उबाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सदस्यांच्या ठरावावर सह्या

निष्ठावान म्हणून शिवसेना उबाठा पक्षात ओळखल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मागील काही काळात वादग्रस्त विधाने केली आहेत. तसेच उपसभापती पदावर कायम राहता यावे यासाठी शिवसेना उबाठा पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांची आमदारकी धोक्यात आली. मात्र त्यांच्या अपात्रतेसंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यापूर्वीच नोटीस दिलेली असतानाही त्यावर अद्याप निर्णय झाला नव्हता. मात्र यासंदर्भात नव्याने महाविकास आघाडीच्या वतीने उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अश्विवास दर्शक ठराव विरोधकांनी विधान परिषदेत आणला आहे. तसेच यासंदर्भातील नोटीसही नीलम गोऱ्हे यांना बजावण्यात आली.

नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यां​च्या स्वाक्षरीसह सभापती प्रा. राम शिंदे आणि विधिमंडळ सचिवांकडे बुधवारी सादर​ करण्यात आला आहे. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

त्यातच नवी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमा​त शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेत उपसभापती असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागतात, असे आरोप केल्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद उमटले. मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर सडकून टीका केली होती.

या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास आणण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभापती शिंदे यांना पत्र लिहिले आहे. पत्रात, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १८३ (ग) आणि म.वि.प. नियम ११ प्रमाणे महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोन्हे यांनी सभागृहाचा विश्वास गमावला असल्याने त्यांना उपसभापती या पदावरुन दूर करण्यात यावे, असा प्रस्ताव पाठविला आहे. तसेच नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात आणण्यात आलेल्या अविश्वास ठरावाच्या प्रस्तावावर शिवसेना उबाठाचे अनिल परब, सुनील शिंदे, सचिन अहिर, ज. मो. अभ्यंकर, मिलिंद नार्वेकर, काँग्रेसचे नेते भाई जगताप, अभिजित वंजारी, राजेश राठोड, राष्ट्रवादीकडून (शरद पवार) एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे यांनी स्वाक्षरी केल्या आहेत.

प्रस्तावाला विलंब झाला – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी आमच्याकडूनच उशीर झाला. त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई होऊन त्यांचे आतापर्यंत निलंबन व्हायला हवे होते. आता अविश्वास प्रस्ताव अधिवेशनात आणल्यावर त्यावर चर्चा अपेक्षित आहे. कोणीही नियम आणि कायदेभंग केला असेल तरीही त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

About Editor

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची टीका, दिल्लीतील आरक्षणविरोधी आंदोलन उच्च जातींचे वर्चस्व टिकवण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाचे मौन तितकेच निंदनीय आणि यामध्ये सामील असल्याचा संकेत

दिल्लीतील ‘आरक्षणविरोधी’ आंदोलने तथाकथित उच्च जातींकडून आपले वर्चस्व टिकवण्याचा एक उघड प्रयत्न दर्शवत असल्याचे वंचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *