मुंबईः प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्या जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले. मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद स्वतः भूषविली, कुटुंबातील इतरांना पदे मिळवून दिली. पण त्या जातीसाठी पवार यांनी काहीच केले नाही. जे केले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले हे पवार यांनी लक्षात ठेवावे असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ठामपणे सांगितले.
शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना तावडे यांनी आज सांगितले की, पवार यांनी वृत्तपत्राच्या मुलाखतीत म्हटले आहे की, फडणवीसांची जात मी गेल्या पाच वर्षात कधी काढली ? पण शरद पवार बहुधा विसरले की, ज्यावेळी छत्रपती संभाजी राजे यांना नरेंद्र मोदी यांनी जेव्हा राज्यसभेवर खासदार म्हणून घेतले. त्यावेळी पवार यांचे वक्तव्य होते की, जुन्या काळात छत्रपती फडणवीस नेमायचे, आता फडणवीस छत्रपतींना नेमायला लागले आहेत. त्यामुळे इतका विखारी जातीयवाद हा शाहु, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात शरद पवार यांच्यामुळेच पहायला मिळाल्याची टीकाही त्यांनी केली.
तरुणांना हे अजिबात आवडत नाही. विकासावरच राजकारण केलं पाहिजे आणि प्रगतीवरच राजकारण केल पाहिजे असा हा पुरोगामी छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र मानतो असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या निवडणूक प्रचारसभेत स्पष्ट केले आहे की, राहुल गांधी आणि विरोधकांनी सगळयांनाच शिव्या दयायला सुरुवात केली आहे. तुम्ही व्यक्ती म्हणून टीका करा. पण समुह म्हणून, जात म्हणुन, समुदाय म्हणुन टीका करु नका असेही ते म्हणाले.
Marathi e-Batmya