एकनाथ शिंदे यांची टीका, विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा फडकणार

नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका तीनही ठिकाणी भगवा फडकवलाच पाहिजे. मी कायम कार्यकर्ता राहणार. शिवसैनिक हा माझा देव आहे. चला, एकजुटीने उतरा आणि इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज व्हा”, असे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थेचे रणशिंगे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातून फुंकले.

कोल्हापूरच्या मार्केट यार्ड परिसरातील रामकृष्ण लॉन्स येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करत विरोधकांना तीव्र शब्दांत इशारा दिला. “२ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल… गुलाल आम्हीच उधळणार,” असा विश्वासही यावेळी व्यक्त केली.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून यापूर्वीप्रमाणेच याही निवडणुकांमध्ये येथे भगवा फडकणारच आहे, असा विश्वास व्यक्त करत शिवसैनिक हा पक्षाचा आत्मा असल्याचे सांगत “जो काम करेल तोच पुढे जाईल. कार्यकर्त्यांच्या घामावर, निष्ठेवर आणि दमदार तयारीवरच शिवसेना उभी असल्याचेही यावेळी सांगितले.

एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, सरकारच्या कामकाजाचा पाढा वाचत सांगितले की शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचे मदतपॅकेज, कर्जमाफीसाठी प्रक्रिया, महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना, बचत गटांना वाढीव निधी, तर कोल्हापूरसाठी पंचगंगा शुद्धीकरण प्रकल्पाला ५०० कोटी, केशवराव भोसले नाट्यगृहासाठी २५ कोटी आणि आयटी पार्कसह मोठे प्रकल्प जाहीर करण्यात आले आहेत. “आपण दिलेला शब्द पाळतो, ती काळ्या दगडावरची रेघ आहे. प्रिंटींग मिस्टेकची सरकारे दुसरीकडे असतात, आम्ही काम करून दाखवतो,” असे म्हणत विरोधकांवर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले.

विरोधकांच्या टीकेवर पलटवार करत एकनाथ शिंदे म्हणाले, “लोकसभेत खोटा नॅरेटिव्ह पसरवला, पण विधानसभेत आम्ही त्यांचा टांगा पलटी केला. आता नगरपालिकांमध्येही त्यांच्या गोटात फरफट होणार. महाराष्ट्राच्या जनतेने मोगलाई चालणार नाही हे दाखवून दिलं आहे. कोल्हापुरात कुस्तीची ताकद आहे, विरोधकांना थेट धोबीपछाड द्या.” असे आवाहनही यावेळी केले.

एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सज्जतेचा संदेश देत सांगितले, गाव तिथे शिवशाही, घर तिथे शिवशक्ति. मतदारयादी तपासा, आपला मतदार राहिला पाहिजे. बूथप्रमुख हा विजयाचा शिल्पकार आहे. निवडणुकीतच नाही तर संकटातही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहा. सत्ता येते-जाते पण नाव आणि मान गेला तर परत येत नाही असेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेना हा पक्ष नसून कुटुंब आहे. आम्ही माणसांना प्रेम देतो. रोज शेकडो प्रवेश होत आहेत. १०२ ग्रुप पक्ष प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. शिवसेनेवर विश्वास वाढत चाललाय. विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. ३ तारखेला दिवाळीपेक्षाही मोठ्या फटाक्यांची रोषणाई महाराष्ट्रात होणार, अशा शब्दांत महायुतीच्या विजयाबाबत विश्वास दाखवला.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *