मुंबईः प्रतिनिधी
उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी राज्य शासनाने दरवर्षीप्रमाणे रुपये ५० लाख इतके अर्थसहाय्य मंजूर केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी मंजूर करण्यात आलेले अर्थसाहाय्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ३० जुलै, २०१९ रोजीच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी एका पत्रकाव्दारे दिली.
आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि आचारसंहितेचा संभाव्य कालावधी लक्षात घेऊन अ. भा. साहित्य महामंडळाला साहित्य संमेलनाच्या नियोजनात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, याची काळजी महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. गेल्या ४ वर्षांपासून हे अनुदान विजयादशमी आधीच साहित्य महामंडळाच्या खात्यात जमा करण्यात येते. या वर्षीची परिस्थिती लक्षात घेऊन मराठी भाषा विभागाने त्याही आधी अनुदान जमा करण्याची तत्परता दाखवली याबद्दल साहित्य वर्तुळात समाधान व्यक्त केले जात आहे.
Marathi e-Batmya