जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने तब्बल १८ ठिकाणी विजय मिळवला आहे. या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगली जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष ठरला आहे. माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने हा भव्य विजय मिळवल्यामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर जयंतराव पाटील यांचेच वर्चस्व कायम असल्याचे सिद्ध झाले आहे.
या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला ११, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला १, भाजप १६, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) ६, शिवसेना शिंदे गट ८, इतर पक्ष २ ठिकाणी विजय मिळवता आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी या विजयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीवर मोठ्या प्रमाणात विश्वास टाकला त्याबद्दल मी तिन्ही पक्षांच्या वतीने माय बाप जनतेचे आभार व्यक्त करतो.
जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, जिल्ह्यात हुकूमशाही सुरू होती, गुंडगिरीला खतपाणी घातले जात होते, वादग्रस्त वक्तव्य करून जिल्ह्याच्या संस्कृतीला डाग लावण्याचा प्रयत्न केला जात होता. तसेच शेतकऱ्यांवर अन्यायकारक नियम लादले जात आहेत. या सर्वांना जनतेने मतदानातून उत्तर दिले आहे.
शेवटी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, सांगलीच्या मातीने कधीही अविचारांना थरा दिला नाही. आपल्या जिल्ह्याची ही ओळख अबाधित ठेवण्यासाठी जनतेचे पुनश्च एकदा आभार!
Marathi e-Batmya