आशिष शेलार यांची माहिती, शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवण येथे अध्यासन केंद्र शासनाकडून निधी मंजुर

सिंधुदुर्गातील सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठअंतर्गत स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून ५० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिली. या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील किल्ल्यांच्या अभ्यास, संशोधन आणि दस्तावेजीकरणाला नवी दिशा मिळणार असून हे अध्यासन मालवण येथे स्थापन होणार आहे.

आशिष शेलार पुढे म्हणाले की, हे अध्यासन केंद्र ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन, संशोधन प्रबंध, व्याख्यानमाला, युवा संशोधकांना मार्गदर्शन आणि सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट, सर्जेकोट या चारही किल्ल्यांच्या वारशाचे शास्त्रशुद्ध नोंदणीकरण अशा बहुआयामी उपक्रमांसाठी कार्य करणार आहे. शिवकालीन व्यापाराचे महत्वाचे केंद्र म्हणून ओळखल्या गेलेल्या या भागातील ऐतिहासिक दाखल्यांचा सखोल अभ्यास होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा आणि दूरदृष्टीचा व्यापक प्रसार करण्यास हे अध्यासन हातभार लावेल, असा विश्वासही व्यक्त केला.

सिंधुदुर्ग किल्ल्याला ३५८ वर्षे १२ एप्रिल २०२५ ला पूर्ण झाली, त्या निमित्ताने आयोजित केलेल्या गडावरील सांस्कृतिक कार्यक्रमात मंत्री आशिष शेलार यांनी या अध्यासनाची घोषणा केली होती. पालकमंत्री नितेश राणे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी मालवण मधील या विषयाच्या तज्ज्ञांना घेऊन प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्याचा अभ्यास करून शासनाने या अध्यासनाची रचना केली आहे.

सिंधुदुर्ग किल्ला, पद्मदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला आणि सर्जेकोट किल्ला या चार किल्ल्यांबद्दल अभ्यासपूर्ण माहिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे, या विषयासंदर्भात सर्व कागदपत्रे जमा करून त्यावर अभ्यास करावा लागणार आहे. याठिकाणी व्यापाराचे बेट होते, त्याबाबतचे ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाकडून मुंबई विद्यापीठाला सिंधुदुर्ग किल्ला, पद्मदुर्ग किल्ला, राजकोट किल्ला आणि सर्जेकोट किल्ला या चारही किल्ल्यांच्या अभ्यासासाठी अध्ययन केंद्राची आवश्यकता होती.  त्याला मुर्त स्वरूप देत त्यासाठी आवश्यक असणारा ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती विभागामार्फत देण्यात आली आहे.

शेवटी आशिष शेलार म्हणाले की, याद्वारे जास्तीत जास्त युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी, देश घडवावा, राज्य घडवावे आणि त्याचा अभ्यास करावा असे आवाहनही केले.

About Editor

Check Also

राज्यपाल वर्मा यांची स्पष्टोक्ती, घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त जागतिक अर्थव्यवस्थेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही कालसुसंगत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्यांच्या विचारांमुळेच वंचित, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *