प्रताप सरनाईक यांची माहिती, आता… ‘ गाव तिथे ’ नव्हे तर… ‘ आदिवासी पाडा, तिथे एसटी ’! एसटी बस आदीवासी पाड्यापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प

सह्याद्री व मेळघाटच्या कुशीत, धुक्याने वेढलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये, आजवर केवळ पायवाटांनीच ओलांडलेले अंतर आता ‘लालपरी’ च्या चाकांनी मोजले जाणार आहे! राज्यातील दुर्गम आदिवासी पाड्यापर्यंत एसटीची सेवा पोहोचवण्याचा ऐतिहासिक संकल्प परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला.

“आता केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आदिवासी पाडा तिथे एसटी,” असा ठाम निर्धार करत त्यांनी विकासाचा नवा अध्याय सुरू केल्याची घोषणा केली.

‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी ’ मिडी बसेस – विकासाची नवी वाट

पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्य परिवहन महामंडळ ९ मीटर लांबीच्या, ३५ आसनी अशा १०० अत्याधुनिक मिडी बसेस खरेदी करीत असून या बसेसना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ असे प्रेरणादायी नामकरण करण्यात येणार आहे. अरुंद रस्ते, तीव्र चढ-उतार आणि वळणावळणाच्या घाटरस्त्यांवरून सहज धावू शकतील, अशा या बसेस खास करून आदिवासी पाड्यांसाठीच नियोजित आहेत.

प्रताप सरनाईक पुढे बोलताना म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या आठ दशकांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एसटी पोहोचली. आज तब्बल ९३% लोकसंख्या एसटी सेवेशी जोडलेली आहे. तरीही सह्याद्री व मेळघाटच्या दऱ्याखोऱ्यातील अनेक पाडे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूरच राहिले होते. मोठ्या बसेसना तिथे प्रवेश शक्य नव्हता; त्यामुळे शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी आदिवासी बांधवांना अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत होती.

आता मात्र ही पायपीट थांबणार आहे. पायवाटांवरून चाकवाटांकडे…

प्रताप सरनाईक म्हणाले की, ही केवळ बससेवा नाही, तर सामाजिक समावेशकतेचा सेतू आहे. शिक्षणासाठी शहरात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, आरोग्यसेवेसाठी धाव घेणाऱ्या मातांसाठी आणि रोजगाराच्या शोधात निघालेल्या तरुणांसाठी ही ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी ’ बस म्हणजे आशेचा किरण ठरणार आहे.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी आशावाद व्यक्त करत सांगितले की, “दुर्गम भागातील आपला आदिवासी समाज आता एसटीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राशी जोडला जाईल. विकासाची गंगा प्रत्येक पाड्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आमचा निर्धार आहे.”

विकासाचा नवा संकल्प

‘ लालपरी ’च्या चाकांमध्ये आता केवळ प्रवास नाही, तर परिवर्तनाची गती दडलेली आहे. डोंगर-दऱ्यांतील शांत पाड्यांवर लवकरच एसटीचा हॉर्न घुमेल आणि त्या आवाजात विकास, समता आणि संधींची नवी पहाट दडलेली असेल. असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

About Editor

Check Also

मंगलप्रभात लोढा यांची माहिती, महादृष्टी प्रकल्पाला आशियायी बँकेकडून चार हजार कोटींचे कर्ज कौशल्य विकासात महाराष्ट्र घेणार उंच भरारी, समाजातील दुर्बल घटकांनाही होणार लाभ

केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या छाननी समितीने कौशल्य विकास विभागाच्या महत्वकांक्षी ‘ महादृष्टी ‘ प्रकल्पाला मंजुरी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *