शिक्षिकेला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा कामावर बहिष्कार टाकण्याचा शिक्षक भारतीचा इशारा

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात निवडणूकीशी संबधित एसआरएच्या शिक्षकांच्या कामाबाबतची लक्षवेधी विधान परिषदेत उपस्थित करण्यात आली होती. त्यावेळी त्यास शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी उत्तर देत एसआय़आरच्या कामाचा शिक्षकांच्या अध्यापनावर कोणताही परिणाम होत नसल्याचे उत्तर दिले होते. त्यास काही दिवसांचा अवधी लोटत नाही तोच एसआयआरच्या कामाच्या अतित्रासामुळे आणि या कामाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्याकडून महिला शिक्षिकेला अतित्रास देत त्या महिला शिक्षिकेला आत्महत्येस प्रवृत्त करण्याची घटना उघडकीस आली असून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा काम थांबवू असा इशारा शिक्षक भारतीने दिला.

BLO /SIR ड्युटीच्या अतित्रासामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. घाटकोपर येथील महिला शिक्षिकेला ड्युटीतून वगळण्यात यावे यासाठी शिक्षक भारतीने महानगरपालिका शिक्षणाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयाकडे विनंती केली होती. पण सवलत न देता उलट जास्तीचा त्रास द्यायला सुरुवात केली. म्हणून आजची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षक भारती याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे. या घटनेमुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. सदर घटनेस जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी केली आहे.

शाळेची एक ड्युटी करून बीएलओ/एसआयआर कामासाठी सततचा अपमान, कामाचा ताण, रात्री उशिरापर्यंत फोनवर कारवाई आणि एफ आय आर च्या धमकी यामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. पोलिस स्टेशनमध्ये बोलावून महिला शिक्षकांवर FIR करण्याचे प्रकार घडत आहेत. मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर कारवाईचे करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हे सर्व प्रकार तातडीने बंद करून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बीएलओ/एसआयआर ड्युटीतून तात्काळ वगळण्यात यावे अशी मागणी सुभाष मोरे यांनी केली.

शिक्षणमंत्र्यांनी मुंबईसाठी स्वतंत्र बैठक घ्यावी

शिक्षक भारती संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकारी, तहसीलदार कार्यालय तसेच महानगरपालिका आयुक्त यांना अनेक वेळा बीएलओ एसआयआर ड्युटीवर असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून 9 जुलै 2026 रोजी झालेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत मुंबई महापालिकेच्या आयुक्तांसोबत बैठक घेण्यात येईल असे आश्वासन माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहे. त्यानुसार तातडीने बैठक घ्यावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे उपाध्यक्षा नंदा कांबळे यांनी सांगितले.

About Editor

Check Also

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते ‘१०० सर्वाधिक प्रभावशाली महिलांचा सन्मान’ महिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती

महिला स्वयंसहायता गटांमुळे देशातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय सक्षमीकरणाला गती लाभली असून ग्रामीण – …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *