नवी दिल्लीः प्रतिनिधी
आर्थिक सर्व्हेक्षणात भाकित केल्याप्रमाणे पाच लाखापर्यंतच्या उत्पन्न कमाविणाऱ्यांना कोणताही आयकर भरावा लागणार नाही. तर त्याहून अधिक उत्पन्न कमाविणाऱ्यांना १० टक्के, १५ टक्के, २० टक्के, २५ टक्के आणि ३० टक्के आयकर भरावा लागणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. संसदेत आज अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी वरील घोषणा केली. केंद्र सरकारच्या या नव्या कररचनेमुळे मध्यमवर्गीयांना सर्वाधिक दिलासा मिळाला आहे.
या अर्थसंकल्पात अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. शेतकरी, बेरोजगार, ज्येष्ठ नागरिक, बँक खातेदार, उद्योजक या सगळ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या बजेटमधून करण्यात आला. जवळपास दोन तास ४१ मिनिटं अर्थसंकल्पीय भाषण करत त्यांनी अर्थसंकल्प सादर केला.
नव्या कर रचनेनुसार पाच ते साडेसात लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्यांना १० टक्के कर, ७.५० ते १० लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना १५ टक्के कर, १० ते १२.५ लाखापर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांना २० टक्के कर तर ज्यांचं करपात्र उत्पन्न १२.५ लाख ते १५ लाख आहे, त्यांना २५ टक्के कर आकारला जाणार आहे. ज्यांचं करपात्र वार्षिक उत्पन्न १५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना ३० टक्के कर आकारला जाणार आहे. वार्षिक उत्पन्न पाच लाखांपर्यंत असणाऱ्यांना करातून सूट देण्यात आली आहे.
दरम्यान मोदी सरकारने शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी १६ मोठ्या घोषणा केल्या आहेत. तर महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
Marathi e-Batmya