दिल्लीत संसदेच्या आवारात भाजपा आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर राज्यातही तेथील घटनांचे पडसाद उमटत आहेत. भाजपाच्या खासदारांनी काँग्रेसच्या खासदारांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावरून संसदेच्या आवारात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र त्यानंतर भाजपाच्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्लाबोल करत काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड, सामानाची नासधुस करण्याचा प्रयत्न करत नेत्या सोनिया गांधी यांच्या बॅनरवर शाई फेकण्याचे प्रयत्न केल्याची घटना घडली.
दरम्यान काँग्रेसच्या एका महिला पदाधिकाऱ्यांने सांगितले की, भाजपाचे कार्यकर्त्ये कार्यालयात घुसल्यानंतर त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या अंगावर हात उगारण्याचा प्रयत्न केल्याचेही यावेळी सांगितले. यावेळी पोलिसांनी भाजपाच्या जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र जमाव ऐकत नसल्याचे लक्षात येताच पोलिसांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचे एकाने सांगितले.
भाजपाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमानकारक भाषेत नाव घेतल्याने मागील दोन-तीन दिवसांपासून काँग्रेसने अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. तसेच अमित शाह यांच्या विरोधात आंदोलनही करत आहेत. त्यावर भाजपानेही काँग्रेसवर पलटवार करत आज काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात केलेल्या अवमानाच्या निषेधार्थ काँग्रेसच्या विरोधात आंदोलन सुरु केले. त्यावेळी दिल्लीत भाजपा आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले.
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आज मुंबई माराठी पत्रकार संघ आणि प्रेसक्लब जवळ असलेल्या मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. सुरुवातीला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर शाई फेकली. त्यानंतर खुर्च्या फेकून देण्यात आल्या. तसेच काँग्रेसच्या कार्यालयावरही दगडफेक केली.
भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या या हल्ल्याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा काँग्रेस कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आला. यावेळी पोलिसांकडून भाजपाच्या कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी लाठीचार्जही करण्यात आला. यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांकडून करण्यात येत आहे.
संविधान वाचविणाऱ्यांवर हे लोक आता हल्ला करत आहेत.संविधान मानणाऱ्यांवर हल्ला करत आहेत. आता त्यांनी मुंबईत हल्ला केला. हिंमत असेल तर सूचना देऊन यायचं होतं, चोराप्रमाणे का आलात असा सवालही यावेळी एका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांने भाजपाला केला.
Marathi e-Batmya