पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला जबाबदार असलेल्यांना शिक्षा होईपर्यंत आपण शांत बसणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिला.
अजित पवार आपल्या सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये म्हणाले की, अनेकांचे मनापासून प्रेम करणारे नेते बाबा सिद्दीकी यांच्या दु:खद निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस उद्ध्वस्त झाली आहे आणि वैयक्तिकरित्या मी एक प्रिय मित्र गमावला आहे. ज्याला मी वर्षानुवर्षे ओळखतो. आम्ही हृदय दु:खी आहोत. आम्ही या घटनेची क्रूरता समजून घेत आहोत, आम्ही हृदयापासून दु:खी असल्याचेही यावेळी सांगितले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, राजकीय फायद्यासाठी इतरांच्या दु:खाचा गैरफायदा घेण्याची ही वेळ नाही. या भयावह घटनेचे राजकारण करू नये, असे आवाहन करत सध्या तरी न्याय मिळवून देण्यावर आमचा भर असायला हवा, असेही सांगत सर्वात जास्त नुकसान झालेल्या बाबा सिद्दीकी यांच्या शोकाकुल कुटुंबाच्या भावनांचा आदर करण्याची गरज आहे. संधीसाधू लोकांनी या दुर्घटनेचे राजकीय तमाशात रूपांतर न करता आदर आणि करुणा दाखवण्याचे आवाहनही केले. हा काळ ऐक्याचा, शोकाचा आणि जिव्हाळ्याच्या नेत्याचे स्मरण करण्याचा असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कूपर हॉस्पिटलमध्ये बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सकाळी कूपर रुग्णालयात भेट घेतली. या हल्ल्याचा निषेध करताना अजित पवार म्हणाले की, पोलीस या हत्येचा तपास करत आहेत, दोन लोकांना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले आहे आणि पाच वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोलिसांच्या टीम शोध घेत आहेत. सिद्दीकी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करताना अजित पवार म्हणाले की, बाबा आता आमच्यात नाहीत यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. या कठीण काळात आम्ही झिशान आणि त्याच्या कुटुंबियांसोबत आहोत, असे पवार म्हणाले.
शवविच्छेदनानंतर सिद्दीकी यांचा मृतदेह त्यांच्या घरी नेऊन जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमचे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्या दुर्दैवी निधनाच्या पार्श्वभूमीवर १३ ऑक्टोबर म्हणजेच रविवारचे पक्षाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
Marathi e-Batmya