मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले. पोलिसांनी त्यांना सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शांततापूर्ण निदर्शने करण्याची परवानगी दिली होती. पोलिसांनी त्यांच्या आंदोलनाला आणखी एक दिवस मुदतवाढ दिली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आतापर्यंत जे सीन व्हायचे होते ते सीन झालेले आहेत. आता मराठा आरक्षणासाठी शेवटची फाईट असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ही करा किंवा मराची लढाई आहे. आता मी मागे हटणार नाही, एकतर सरकारने आरक्षण द्यावे, नाहीतर मी उपोषण करून मरेन असे सांगत त्यांच्या काही चेले चपाटे जे आहेत ते राज्यपाल कोट्यातून एखादी सिट मिळेल का म्हणून माझ्याविरोधात बोलत आहेत. मात्र त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे सांगत दक्षिण मुंबईत चहा आणि अन्न दुकाने बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका केली. तसेच पाणी आणि टॉयलेटची व्यवस्था केली नाही म्हणून आरोप केला. तसेच माझे कर्तृत्व म्हणून फडणवीस मला विचारतात, पण फडणवीस यांचे कर्तृत्व काय असा सवाल करत दोन समाजाता भांडणे लावणे, आरक्षण देतो म्हणून आरक्षण द्यायचे नाही असे हे तुमचे कर्तृत्व असल्याचे सांगत प्रश्नांचा भडिमार फडणवीसांवर केला
मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी संध्याकाळी पत्रकारांशी बोलताना आंदोलकांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले. तसेच उपोषणासाठी एका वेळी एक दिवसाची परवानगी वाढविण्यावर बोलताना म्हणाले की, हा रडिचा डाव खेळण्याऐवजी एकदाज काय ती मुदत वाढ करायची ना हा रोज रडिचा डाव कशासाठी असा सवालही मुख्यमंत्र्यांना केला.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, जर सरकारने गरीब मराठ्यांना आरक्षण दिले तर ते नेहमीच तुमच्यासोबत असतील. मराठा समाजाची मने जिंकण्याची सरकारकडे चांगली संधी आहे. नाही तर मागण्या पूर्ण होईपर्यंत ते उपोषण सुरू ठेवतील. आम्ही सरकारला पूर्ण सहकार्य करत आहोत, परंतु सरकारकडून कोणतेही सहकार्य नाही. मराठा आंदोलकांना अन्न आणि पाणी मिळू नये म्हणून अन्न आणि चहाची दुकाने बंद ठेवण्यात आली. मराठा मुले अभिमानाने आणि आनंदाने नव्हे तर तीव्र वेदना घेऊन मुंबईत आली आहेत. सरकारने याची दखल घ्यावी असे आवाहनही यावेळी केले.
मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, राज्य सरकार मराठा आणि ओबीसी समाजात वाद निर्माण करत आहे. आम्ही कधीही म्हटले नाही की ओबीसींचे आरक्षण काढून आम्हाला देण्यात यावे. आमचा रेकॉर्ड १५० वर्षे जुना आहे. हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटमध्येही आमच्या समुदायाचा उल्लेख आहे. आम्ही कोणाचाही हक्क हिसकावत नाही, तर आमचा हक्क मागत आहोत. यावेळी आंदोलकांना रस्त्यावर पार्क केलेली वाहने हटविण्याचे निर्देश दिले.
Marathi e-Batmya