मुंबईः प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी मुंबईतील ब्लॅकआऊटची घटना ताजी असताना आज मंत्रालयाच्या मुख्य इमारतीची वीज तब्बल २० मिनीटसाठी खंडित झाली. त्यामुळे मंत्रालयात आलेल्या काही मंत्र्यांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांना काळोखात राहण्याची वेळ आली. अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने अनेक विभागांना आपली कामे करता आली नाहीत. दरम्यान, मेट्रोच्या कामामुळे वीज खंडीत झाल्याची माहिती मंत्रालयातील वीज पुरवठा विभागाने दिली.
संपूर्ण महाराष्ट्राचा राज्य कारभार मंत्रालयातून हाकला जातो. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटाच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडीत झाला. अचानक वीज गेल्याने सर्वच दालने काळोखात गेली. कार्यालयीन कामे यामुळे खोळंबली. त्यामुळे मंत्रालयातील वीज विभागातील अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. सुरुवातीला वीज पुरवठा का खंडीत झाला याचे नेमके कारण कळत नव्हते. मात्र मंत्रालयाला वीज पुरवठा करणाऱ्या विभागाने बेस्टच्या वीज कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी मेट्रोच्या कामामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याचे स्पष्ट केले. तब्बल २० मिनिटानी वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.
मेट्रोच्या कामामुळे वीज पुरवठा खंडीत
मुंबईत मेट्रोच्या कामाचे कामाचे जाळे विणले जात आहे. मंत्रालयासमोर ही मेट्रोची कामे सुरू आहेत. हे काम सुरू असताना मंत्रालयाला वीज पुरवठा करणारी बेस्टची वीज पुरवठावाहिनी ११ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास तुटली. वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहिती बेस्टला दिल्यानंतर १२ वाजून १० मिनिटानी पुरवठा पूर्ववत करण्यात आली, माहिती वीज पुरवठा विभागाने दिली. मात्र सात मिनिटात वीज पुरवठा पूर्ववत केल्याचा दावा बेस्ट प्रशासनाने केला.
Mantralaya
Marathi e-Batmya