मागील काही वर्षात सातत्याने तंत्रज्ञानात क्रांतीकारक बदल होत आहेत. त्यामुळे आताची तरूण पिढी कोणत्याही प्रश्नाची माहिती इतकेच काय एखाद्या ठिकाणचा पत्ता जरी शोधायचा असेल तर हातात आलेल्या स्मार्ट फोनच्या आधारे आणि इंटरनेटच्या माध्यमातून लगेच शोधकार्य सुरु करते. मात्र हातात मावणाऱ्या स्मार्टफोनकडूनही कधी कधी गलथानपणा होऊ शकतो आणि आपली वेळ चुकू शकते यावर हल्लीच्या तरूण पिढीचा विश्वास नसावा. त्यामुळेच की काय छंत्रपती संभाजी नगर अर्थात औरंगाबादेत युपीएससी परिक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना हातातील स्मार्टफोनमधील गुगल नामक सर्च इंजिनने चुकीचा पत्ता दाखवित भलत्याच ठिकाणी पोहोचविले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पत्ता चुकला म्हणून परिक्षा हुकली म्हणण्याची पाळी आली.
झाले असे की, रविवार १६ जून रोजी युपीएससीची नियोजित परिक्षा होणार होती. त्या अनुषंगाने रा्ज्यातील अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या जिल्ह्यात असलेल्या परिक्षा केंद्रांवर परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचावे म्हणून आधीच काही सूचना प्रसार माध्यमातून जारी केल्या होत्या. त्यानुसार छत्रपती संभाजी नगर अर्थात औरंगाबादच्या प्रशासनाकडूनही तशी सूचना जारी करण्यात आली होती. युपीएससी परिक्षा काही केंद्रावर घेण्यात येणार होती.
त्यासाठी छत्रपती संभाजीनगरला युपीएससीची परिक्षा देण्यासाठी अनेक जिल्ह्यातील परिक्षार्थी पोहोचले. मात्र काही विद्यार्थ्यांनी हातातील स्मार्ट फोनमधील गुगलवर अति विश्वास दाखवत त्यांच्या नियोजित परिक्षा केंद्रावर न पोहोचता भलत्याच परिक्षा केंद्रावर पोहोचले. तर तेथे त्यांचे परिक्षा केंद्र नसल्याचे सांगण्यात आले. तेथून पुन्हा या विद्यार्थ्यांनी त्यांना इच्छित असलेल्या परिक्षा केंद्राच्या पत्त्यावर वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत या परिक्षार्थी विद्यार्थ्यांची वेळ हुकली. या विद्यार्थ्यांना इच्छित परिक्षा केंद्रावर पोहोचायला वेळ लागल्याने परिक्षा केंद्रावर पोहोचूनही परिक्षा केंद्राच्या बाहेरच थांबावे लागले. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांसमोर कपाळावर मात मारून घेण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. या सगळ्या घडामोडीत विद्यार्थ्यांना पत्ता चुकला परिक्षा हुकली म्हणण्याशिवाय हाती काहीच राहिले नाही.
Marathi e-Batmya